कुलगुरु डॉ. रवींद्र कुलकर्णी यांचे ‘नवनिर्माण’ टीमकडून स्वागत
'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०' अंमलबजावणीसाठी कार्यशाळा

रत्नागिरी : शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ हे नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यात आले आहे. या धोरणाची सविस्तर माहिती देण्यासाठी लांजा येथील कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयात १४ व १५ जून रोजी दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यात ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ चे सर्वेसर्वा आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रवींद्र कुलकर्णी यांचे स्वागत नवनिर्माण महाविद्यालयाच्या टीमने केले.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून लागू करण्यात आलेले नवीन शैक्षणिक धोरण विद्यार्थीकेंद्रित असल्याने विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडीनुसार विषय निवडून करियर करण्याची संधी निर्माण झाली आहे. विद्यार्थी स्वत:ची कौशल्ये ओळखून त्यांच्या कौशल्यानुसार शिक्षण घेऊन आत्मनिर्भर बनण्यासाठी टाकलेले पुढचे पाऊल म्हणजे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. बारावीनंतरचे उच्च शिक्षण कसे असणार, मेजर आणि मायनर विषय कोणकोणते घेऊ शकतो, तसेच एखादा विषय महाविद्यालयात उपलब्ध नसेल तर तो विषय दुसऱ्या महाविद्यालयामध्ये ही शिकता येण्याची तरतूद नवीन शैक्षणिक धोरणामध्ये केली आहे. या शिक्षणाबरोबरच संगीत, नृत्य अशी वेगवेगळी कौशल्ये जोपासणारे शिक्षण मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेमधून घेता येईल.
हे धोरण अवलंबताना महाविद्यालयांनी काय करणे गरजेचे आहे याची माहिती देण्यासाठी लांजा महाविद्यालयात दोन दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत नवनिर्माण महाविद्यालायची टीम सहभागी झाली होती. यामध्ये प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, हॉटेल मॅनेजमेंट विभागप्रमुख प्रा. ताराचंद ढोबळे, प्रा. सचिन गिजबिले, प्रा. एहलाम खान, प्रा. वर्षा कुबल यांचा समावेश होता.
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी कोकण दौऱ्यावर असताना कोकणातील सर्व महाविद्यालयातील प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी प्रतिनिधींना या धोरणाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.



