रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा काजू उत्पादकांसाठी ९८ कोटी ४४ लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर

मुंबई: कडाक्याची थंडी आणि अवेळी पावसामुळे कोकण विभागातील बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला असून, नुकसान भरपाईपोटी तब्बल २०९ कोटी १० लाख ६ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे.
ऑक्टोबर २०२५ ते एप्रिल २०२६ या कालावधीत झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी ही मदत दिली जाणार असून, यात सर्वाधिक ९८ कोटी ४४ लाख रुपयांचा निधी केवळ रत्नागिरी जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे रत्नागिरीसह कोकणातील सुमारे १ लाख ३४ हजार २५१ शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
महसूल व वन विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील बाधित शेतकऱ्यांना ही मदत थेट त्यांच्या बँक खात्यात (DBT द्वारे) जमा केली जाणार आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषांनुसार हे अनुदान वितरित करण्यात येणार असून, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना आवश्यक त्या सूचना देऊन ही रक्कम कर्ज खात्यात वळती होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत.



