सावर्डे उपविभागात महावितरणने केला युद्धपातळीवर वीज पुरवठा सुरळीत

रत्नागिरी : सावर्डे उपविभागातील २२ मे रोजी झालेल्या वादळी पावसामुळे महावितरणचे २५ हजारांहून अधिक ग्राहक अंधारात होते; मात्र वादळ व पाऊस थांबल्यानंतर वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम महावितरणकडून त्वरित सुरू करण्यात असून, आतापर्यंत २३ हजार ग्राहकांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. सावर्डा, निवळी, कोकरे, डेरवण, कुडप, हडकणी, असुर्डे, खेरशेत या गावांतील काही ग्राहक पोल पडल्यामुळे अजूनही अंधारात आहेत. त्यामुळे उर्वरित काम हे लवकरात लवकर पूर्ण करण्यास महावितरण प्रयत्नशील असल्याचे महावितराणचे अधीक्षक अभियंता नितीन पळसुले-देसाई यांनी सांगितले.
सावर्डा उपविभागामध्ये सावर्डे व डेरवण भागात २२ मे रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास प्रचंड वारा वादळ व पाऊस झाल्यामुळे मोठी झाडे पडली होती. त्या झाडांमुळे महावितरणच्या यंत्रणेची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. यामध्ये तेथे ३३ केव्ही उच्चदाब वाहिनीचे ७ पोल, ११ केव्ही उच्चदाब वाहिनीचे २८ पोल व लघुदाब वाहिनेचे ५४ पोल असे एकूण १०० पोल पडले. तसेच बऱ्याच ठिकाणी लघुदाब वाहिनी व उच्चदाब वाहिनीच्या तारा तुटल्या आहेत. या वादळामुळे महावितरणचे एकूण अंदाजे ३८ लाखांचे नुकसान झाले आहे.
हे पोल पडल्यामुळे सावर्डे उपविभागातील एकूण २५ हजार ५०० ग्राहकांचा वीज पुरवठा बंद होता. वादळ व पाऊस थांबल्यानंतर वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम त्वरित सुरू करण्यात आले. २२ मे रोजी रात्री सुमारे २ वाजेपर्यंत एकूण १३ हजार ५०० ग्राहकांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला. तसेच २३ मे रोजी कामासाठी एकूण ७ अभियंता अधिकारी, ५५ कर्मचारी तसेच ४५ ठेकेदाराची माणसे काम करत होती. आज उच्च दाब तसेच लघुदाब वहिनीचे पोलचे काम झाल्यामुळे एकूण १० हजार ग्राहकांचा विद्युत पुरवठा सुरळीत केला गेला. एकूण २३ हजार ५०० ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत केला असून, सावर्डा, निवळी, कोकरे, डेरवण, कुडप, हडकणी, असुर्डे, खेरशेत या गावांतील काही पोल ग्राहक पडल्यामुळे अंधारात आहेत. उर्वरित काम हे लवकरात लवकर पूर्ण करण्यास महावितरण प्रयत्नशील आहे.



