अशा लाल मातीतलोकसभा २०२४

शहांचा कोकण गेम

राजापूर लोकसभा मतदारसंघ हा देशातील पहिल्या क्रमांकाचा आणि फार मोठी ऐतिहासिक, वैचारिक आणि मूल्याधिष्ठित पार्श्वभूमीचा प्रदीर्घ इतिहास असणारा मतदारसंघ आहे,. ज्या मतदारसंघातून बॅ. नाथ पै, प्रा. मधु दंडवते, कर्नल सुधीर सावंत, सुरेश प्रभू आदी मान्यवरांनी आपल्या बौद्धिक प्रगल्भता आणि विवेकवादी विचारातून लोकशाही आदर्शतेचा, नैतिक आणि चारीत्र्य संपन्नतेचा मूल्याधिष्ठित पाया उभारला. या मूल्याधिष्ठीततेलाच सुरुंग लावत नैतिकतेच्या आदर्श संकल्पनाच मोडीत काढत येथे लाचारांची मांदियाळी उभारावी, येथील प्रस्थापित राजकीय शक्तींनाच नेस्तनाबूत करण्याचा संकल्पच जणू अमित शहा यांनी मांडला आहे का, असा प्रश्न आज मराठी नववर्ष दिनाच्या म्हणजेच पाडव्याच्या मुहूर्तावर लोकमनात चर्चिला जात आहे.
छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने आणि शौर्यगांथांनी पावन असणारी ही कोकण भूमी दिल्लीच्या तख्तासमोर किती लाचार करू इच्छित आहे ही केंद्र सत्ता, असा प्रश्न सर्वसामान्य मतदारांना पडला आहे. भाजपाच्या राजकीय चाणाक्यांना यात साधायचे काय आहे, पुढील काळात कोणाला  बाजूला करायचे आहे?
एक काळ होता ज्यावेळी भाजपमध्ये अत्यंत प्रामाणिक, तत्वनिष्ठ आणि निस्सीम त्यागी वृत्ती असणारे राजकारणी नेते आणि कार्यकर्त्यांची फार मोठी टीम होती. देवगडचे आप्पा गोगटे, कुसुमताई अभ्यंकर, आठल्ये गुरुजी ते डॅा. तात्या नातू ह्या राजकीय नेत्यांचे चरित्र आणि चारित्र्य समाजातील आदर्श होते. मोदी-शहांनी भाजपात नवा प्रवाह आणला आणि आता तर तो सर्व राजकीय पक्षांचा मुख्य प्रवाह झाला आहे.
राजकीय प्रवाहाबरोबर वहात राहत आपला राजकीय आणि आर्थिक फायदा करताना सोबतच्या कार्यकर्त्यांना भक्कम आर्थिक सक्षम करत आपली प्रभावी ताकद कोकणात उभारण्यात नारायण राणे यांची राणेशाही आणि उदय सामंत यांची सामंतशाही अत्यंत यशस्वी झाली आहे. आज संपूर्ण दक्षिण कोकणचा विचार करता, राणेशाही आणि सामंतशाही या दोन अत्यंत प्रबळ अशा राजकीय शक्ती कोकणावर अधिराज्य करत आहेत. कधी कधी ते एकमेकांसमोर उभे राहतात; मात्र प्रत्येकाचा विभाग वेगळा असल्याने प्रसंगी साटेलोटे करत आपली शक्ती राखून आपल्या मतदार आणि कार्यकर्त्यांचा फायदा साधण्यात ते फार मुत्सद्दी आणि वाकबगर मानले जातात.
यातील नारायण राणे हे तर कोकणच्या भविष्यातील अतिभव्य विकासाचा चेहरा अगदी विकास पुरुषच, अशीच त्यांची प्रतिमा उभारली जात आहे. एका बाजूला राणे या नावाची जबरदस्त दहशत कोकणच्या दऱ्या-खोऱ्यातील कडे-कपाऱ्यांनाही हादरवून टाकणारी, त्याचवेळी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विशेष मर्जीतून ते राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा आणि मोदींच्या आशिर्वादाने केंद्रीय मंत्रीपदाचा सरताज प्राप्त झालेले. शिवसेना, कॉंग्रेस या पक्षात असताना त्यांचा पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरही केवढा दरारा होता. अशा जबरदस्त कोकणच्या नेत्याला भाजपमध्ये जाणीवपूर्वक दुय्यम स्थान दिले जात असल्याचे दिसत आहे. राज्यसभेवर पुन्हा राणे यांनाच पाठवणार हे निश्चित असताना कोकणातील  सरकारातील एकमेव केंद्रीय मंत्री राणे यांचे राज्यसभेचे तिकीट कापले जाते आणि राणे यांवर काहीच बोलू शकत नाहीत. आता रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा राणे यांनीच लढवावी, असा आग्रह केंद्राचा आहे. वास्तवात राणे मनापासून त्यासाठी इच्छूकही नाहीत. परंतु शहांच्या मनात त्यांनीच लढवावी असा आग्रह. कोकणच्या राजकीय वाऱ्याची प्रत्येक दिशा अचूक ओळखणारा नेता अशी राणे यांची प्रतिमा आहे. यावेळचा माहोल ते जाणून आहेत. त्यामुळेच ते फारसे उत्सुक नसल्याचे त्यांनी मत व्यक्तही केले; मात्र तरीही त्यांना त्यात ढकलले जात आहे.
दुसऱ्या बाजूला सामंतशाही ही रत्नागिरी जिल्ह्यातील अत्यंत प्रभावी राजकीय ताकद आहे. शरद पवार यांच्या तालमीत घडलेला हा कोकणचा युवा नेता, भावनिकतेपेक्षा राजकारणात व्यावहारिकता महत्त्वाची हा मूलमंत्र जपणारा. ज्या राजकीय पक्षाची झेप मोठी त्याचा झेंडा हाती घ्यावा, हे व्यावहारिक धोरण त्यांना वेगाने पुढे घेऊन गेले. मंत्रीपदावरून थेट शिवबंधन बांधत त्यांनी राजकारणात जी वेगवान झेप घेतली त्यात त्यांनी महाराष्ट्रातील अनेक स्पर्धकांना गारद केले. तोच फॅार्मुला शिंदे सरकारात अंमलात आणत राज्यातील चौथ्या क्रमांकाचे स्थान देत या मतदारसंघाला आणि जिल्ह्याला कोट्यवधींचे निधी आणणारा हुकमाचा एक्का बनून राहिला. सामंतशाहीचा वरचष्मा किती याचा अंदाज भल्याभल्यांना नाही. तो इतका प्रभावी आहे की ते कोणत्या पक्षाचे आहेत हा भाग महत्त्वाचा नाही, तर त्यांचा स्वतःचा असा मतदार आहे. जो ते कोणत्याही पक्षात अथवा अपक्ष असले तरी त्यांचा सोबत राहणारा आणि त्यांना निवडून देणारा आहे. रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री असताना त्यांनी तर अनेकवेळा नारायण राणे यांना साइड ट्रॅक करत थेट सिक्सर मारल्याचे किस्से आहेत. ह्यात फक्त उदय सामंत नाहीत, तर त्यांचे बंधुराज किरण सामंत हे त्यांच्या यशामागील खरे किंगमेकर मानले जात आहेत.
किरण सामंत यांचा संपर्क जनशक्ती आणि धनशक्ती ही राणे यांच्या दोन्ही शक्तींना मागे टाकू शकेल अशी चर्चा आहे. किरण सामंत येथून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी एक वर्षापूर्वीच तयारीला लागले आहेत. अगदी बुथवार त्यांनी मतांची बांधणी केली आहे. त्यांचा एकूण आवाका, सर्वच पातळीवरील जय्यत तयारी आलेले सर्व्हे यांमुळे त्यांचा विजय नक्की असू शकतो, असे शिंदेगट आणि भाजपचे काही नेते मंडळी खासगीत सांगतात; मात्र दिल्ली याची दखल घेण्यास तयार नाही. दिल्ली म्हणते “अभी नही तो कभी नही” हीच एकमेव संधी भाजपच्या वाट्याला हा मतदारसंघ येण्याची. त्यामुळे उमेदवार कोणी असो चिन्ह कमळच असेल.
आता प्रश्न असे निर्माण झाले आहेत, की कोकणच्या या महाराजकीय शक्तींना, वाघांना असे शेळी बनवून त्यांच्या नाकात दोऱ्या घालण्याचे कारस्थान दिल्लीश्वर का करत आहेत? या महाशक्तींची राजकीय शक्ती खच्ची करण्याचे हे कारस्थान तर नाही ना? कोकणच्या स्वाभिमानी नेतृत्वाला असे नामोहरम करत ताटकळत ठेवण्याचे धाडसच दिल्लीश्वर कसे काय करू शकतात?
दुसऱ्या बाजूला गेल्या काही वर्षांत राजकीय पिछाडीवर असणारे भाजपचे माजी आमदार बाळ माने अत्यंत सक्रीय झाले आहेत. त्यांनी गेल्या दोन महिन्यांत संपूर्ण लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला आहे. त्यांच्या भल्या मोठ्या जाहिराती आणि पंतप्रधान मोदींसोबतचे भव्य बॅनर्स, होर्डींग्स हे मोठे आकर्षण झाले आहे. पूर्वीचा कुसुमताईंचा असणारा भाजपचा हा बालेकिल्ला पुन्हा काबीज करत विद्यमानांना खिंडीत गाठण्याची ही चाल तर नाही ना, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. एका बाजूला दादा-शिंदे यांच्या विद्यमान खासदारांना तिकीट नाकारायचे आणि त्यांची पक्षातील विश्वासार्हताच संपवायची हा भाजपचा गेमचेंजर डाव असू शकतो. यातील कोकणचा देशातील पहिला मतदारसंघ पहिले टार्गेट असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. उद्धव ठाकरे गटाचे विनायक राऊत यांना यामुळे निवडणूक सहज सोपी करण्याचे काम प्रत्यक्ष भाजपच करत आहे. हा राजकीय डावपेच भविष्यातील अनेक शक्यतांना चालना देणारा आहे.

– बाबूराव रोखठोके

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button