प्रचारादरम्यान आयोगाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे : एम देवेंदर सिंह

रत्नागिरी : ‘भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शन तत्वानुसार उमेदवारांनी निवडणूक प्रचारादरम्यान आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये तंतोतंत पालन करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले. कोणतीही शंका असल्यास त्याचे निरसन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात उमेदवारांच्या प्रतिनिधींची २३ एप्रिलला बैठक झाली. या बैठकीला सर्वसाधारण निरीक्षक राहुल यादव, खर्च निरीक्षक अंकुर गोयल, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, उप जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदी उपस्थित होते. श्री. सिंह यांनी सविस्तर माहिती दिली. यात प्रामुख्याने विधानसभा मतदारसंघनिहाय मतदारांची संख्या, दिव्यांग मतदार, टपाली मतपत्रिका, गृह मतदान, मतदानासाठी लागणारे छायाचित्रासाह ओळखपत्र, प्रशिक्षण, मतदार चिठ्ठींचे वाटप यांचा समावेश होता.
जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. सिंह म्हणाले, ‘५ एप्रिल रोजी पहिले इव्हीएम सरमिसळ झाले होते. उद्या सकाळी ११ वाजता भारत निवडणूक आयोगाच्या पोर्टलवर दुसरे सरमिसळ होणार आहे. ३४ हजार १११ गृह मतदान वाटप अर्जांपैकी पैकी ८५ वर्षांवरील २ हजार ६७३, दिव्यांगाचे ४०० आणि अत्यावश्यक सेवेमधील ५०० अर्ज परत आले आहेत. १ ते ४ मे पर्यंत गृह मतदान होणार आहे. एकूण १ हजार ९४२ मतदान केंद्र असून, मतदान प्रतिनिधी नेमणुकीबाबत माहिती द्यावी. १४ लाख ५१ हजार ६३० मतदान चिठ्ठीचे वाटप प्रशासनामार्फत होणार आहे. गृह मतदानाविषयी मार्ग नियोजन आपणास दिले जाईल. काही शंका असेल तर कधीही विचारू शकता. त्याबाबत मार्गदर्शन केले जाईल.’



