संस्कृत उपकेंद्रात भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे यांच्या पुण्यतिथी दिनी अभिवादन

रत्नागिरी : कविकुलगुरू कालिदास विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी उपकेंद्रामध्ये आज महामहोपाध्याय भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे यांची ५२ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या प्रसंगी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. काणे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
उपकेंद्रातील प्राध्यापकांनी डॉ. काणे यांच्या जीवन, त्यांचे ग्रंथ साहित्य, कार्य आदि विषयांवर आपापले मनोगत व्यक्त केले. या निमित्ताने भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे यांची माहिती देणाऱ्या लघु चित्रफितीचे प्रसारण सर्वत्र करण्यात आले. यावेळी उपकेंद्रातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
या प्रसंगी उपकेंद्राचे संचालक डॉ. मराठे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘महान व्यक्तींचे कार्य हे केवळ तत्कालापुरते मर्यादित नसून त्यामागे शाश्वत विचारधारा असते. डॉ. काणे यांनी धर्मशास्त्राचा इतिहास या ग्रंथाची रचना करून जे महान योगदान दिले त्याला मोठे कार्य असे म्हणण्यापेक्ष त्यांनी धर्मशास्त्राच्या इतिहासाच्या रचनेद्वारे समाजात सुधारणा घडवून आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले.’



