तहव्वुर राणाला घेवून NIA पथक दिल्लीत दाखल!

नवी दिल्ली : २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दोषी तहव्वुर राणाला आज भारतात आणले. एनआयए आणि गुप्तचर संस्था रॉ यांचे संयुक्त पथक बुधवारी एका विशेष विमानाने तहव्वूरसोबत रवाना झाले. त्याला कडक सुरक्षेत भारतात आणले गेले.
एनआयए आणि रॉ टीमच्या सुरक्षेत ते आज दुपारी एका खास विमानाने दिल्ली विमानतळावर उतरले. भारतात पोहोचताच एनआयए टीम त्याला अधिकृतपणे ताब्यात घेईल. यानंतर, राणाला बुलेटप्रूफ कारमधून एनआयए मुख्यालयात नेले जाणार आहे. एनआयए मुख्यालयाकडे जाणारा रस्ता पोलिसांनी बंद केला आहे.
आरोपी तहव्वुर राणा याला आज (दि. १०) राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NAI) मुख्यालयात आणले जाणार आहे. त्याला गुरुवारी अमेरिकेने प्रत्यार्पण केले होते. या पार्श्वभूमीवर आज दिल्लीतील अनेक भागात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
राणा पालम विमानतळावरून बुलेटप्रूफ वाहनातून राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) मुख्यालयात पोहोचणार आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाला सतर्क ठेवण्यात आले आहे. विमानतळावर SWAT (विशेष शस्त्रे आणि रणनीती) कमांडो आधीच तैनात करण्यात आले आहेत.
एनआयए मुख्यालयात एक चौकशी कक्ष तयार करण्यात आला आहे. एनआयएचे डीजी सदानंद दाते, आयजी आशिष बत्रा आणि डीआयजी जया रॉय यांच्यासह फक्त १२ सदस्यांना प्रवेश देण्यात आला असल्याचे वृत्त ‘इंडिया टूडे’ने दिले आहे.
राणाला अमेरिकेत अटक झाली होती. यानंतर तब्बल १६ वर्षांनी अमेरिकेतून त्याचे प्रत्यार्पण करण्यात आले.आज त्याला भारतात आणल्यानंतर NIA त्याला अधिकृतपणे अटक करेल. राणाला पटियाला हाऊस कोर्टात हजर केले जाऊ शकते.
हजर होण्यापूर्वी त्याची वैद्यकीय चाचणी केली जाईल. तहव्वुर राणाला दिल्लीतील तिहार तुरुंगातील उच्च सुरक्षा वॉर्डमध्ये ठेवण्यात येईल. तुरुंग प्रशासनाने विशेष सुरक्षा व्यवस्था केली आहे.
२६ नोव्हेंबर २००८ रोजी दहशतवाद्यांनी मुंबईतील १२ ठिकाणी एकाचवेळी हल्ला केला हाेता. यामध्ये १६६ नागरिक ठार झाले हाेती. दहशतवादी अजमल कसाब याला जिवंत पकडण्यात मुंबई पाेलिसांना यश आले हाेते.



