सोई सुविधांअभावी ताम्हाने ग्रामस्थ आक्रमक
उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशारा

संगमेश्वर : तालुक्यातील कोसो दूर असणाऱ्या ताम्हाने गावात शासकीय सोयी सुविधांचा अभाव असल्याने यावर आता ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले आहे. या गावातील ग्रामस्थ एकत्र येऊन संगमेश्वरमधील विविध शासकीय कार्यालयात धडक देत संबधित अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन समस्या मांडल्या आहेत. उपाययोजना झाल्या नाहीत तर आंदोलनाचा इशारा देखील ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून ताम्हाने गावातील ग्रामस्थ विविध समस्यांनी ग्रस्त झाले आहेत. विविध वाडीतील पाण्याची समस्या मिटण्यासाठी जलजीवन योजने अंतर्गत कोट्यवधीचा निधी मिळून सुद्धा अजून पर्यंत ताम्हाने गावातील ग्रामस्थ पाण्यापासून वंचित आहेत. ज्येष्ठ नागरिक सहित सर्वाना हा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे गावातील जाणकार ग्रामस्थांनी संगमेश्वर पंचायत समिती देवरुख कार्यालय येथे गट विकास अधिकारी, पाणी पुरवठा विभाग यांना भेटी देऊन येत्या काही दिवसात पाणी समस्येवर योग्य कार्यवाही करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याची भूमिका घेऊ असा थेट इशाराच दिला आहे.
ताम्हाने फाटा ते कोसुंब मार्ग नादुरुस्त साईड पट्टी, पावसाळ्यात भेडसावणाऱ्या समस्या, ताम्हाने फाटा येथील खड्डेमय रस्त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यावर चर्चा करण्यासाठी देवरुख येथील सार्वजनिक बांधकाम कार्यलयाला भेट घेतली. तसेच ताम्हाने येथील मार्गांवर अनेक अवजड वाहतूक, चिरे, वाळू, खडी ही वाहने वेगाने भरधाव जातात त्यावर वेळेत निर्बंध यावा यासाठी देवरुख पोलीस ठाणे येथे ग्रामस्थांनी भेट दिली.
ताम्हाने गावातील अनेक वीज वाहतुकीच्या तारा, विजेचे खांब जुने तसेच तारा एकमेकांला घर्षन होऊन दुर्घटना होऊ नये तसेच इतर समस्या साठी देवरुख येथे महाराष्ट्र राज्य विद्युत प्राधिकरण येथे ग्रामस्थांनी भेट घेतली.
गावातील ग्रामस्थांनी विविध समस्या हाती घेऊन अनेक शासकीय कार्यालय वर धडक देऊन महत्त्वाच्या चर्चेअंती निवेदन देऊन उचित कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला आहे.



