आधुनिक आव्हानांचा चक्रव्यूह भेदण्यासाठी गर्भसंस्कार महत्त्वाचे : वैद्या मंजिरी जोग

रत्नागिरी : बाळ मातेच्या पोटात वाढत असतानाच केलेले गर्भसंस्कार हे त्याच्या आयुष्यभराची पायाभरणी असते. मातेची प्रत्येक कृती बाळावर परिणाम करत असते हे संशोधनाने सिद्ध झाले आहे. यामुळेच गर्भसंस्कार अत्यंत उपयुक्त असल्याचे शास्त्र सांगते. आधुनिक आव्हानांचा चक्रव्यूह भेदण्यासाठी गर्भसंस्कार महत्त्वाचे वैद्या मंजिरी जोग यांनी सांगितले.
सुमारे वर्षभरापासून रत्नागिरीकरांच्या सेवेत अंकुर गर्भसंस्कार केंद्र दाखल झाले. रत्नागिरीतील २५ मातांनी या गर्भसंस्कार केंद्राचा आतापर्यंत लाभ घेतला आहे. टिळक आळी येथे सुरू असलेल्या या गर्भसंस्कार केंद्राचे आता जोशी कॉम्प्लेक्स, मारुती मंदिर येथे स्थलांतर झाले आहे. या स्थलांतराच्या निमित्ताने वैद्य मंजिरी जोग यांनी आधुनिक काळातल्या बदलत्या आव्हानांना सक्षमपणे तोंड देण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या गर्भसंस्कारांचं महत्त्व अधोरेखित केले.
त्या म्हणाल्या, मातांचे प्रकृती परीक्षण करून त्यांचे वय, गर्भाची अवस्था यानुसार आयुर्वेद, पंचकर्म, आहार, योग आणि संगीतोपचार या पंचसूत्रांच्या साह्याने हे गर्भसंस्कार केले जातात. प्रत्येक मातेच्या गरजेनुसार आवश्यक ते संस्कार दिले जातात. अशा या गर्भ संस्कारामुळे आम्हाला खूप फायदा झाला असल्याचे गेल्या वर्षभरात हे संस्कार घेतलेल्या मातांनी आवर्जून सांगितले आहे.
तीस वर्ष आयुर्वेदिक वैद्यकीय सेवेचा अनुभव असलेल्या वैद्या मंजिरी जोग यांनी एनआयए जयपूर या संस्थेने उपलब्ध करून दिलेले गर्भसंस्कारांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले आहे. आताच्या काळात विभक्त कुटुंबपद्धती लांबच्या शहरात असणारी नोकरी यामुळे घरापासून दूर जाणारे तरुण तरुणी जेव्हा बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतात तेव्हा या बाळावर गर्भातच संस्कार करणे अधिक उपयुक्त ठरते. गर्भसंस्कारंबरोबरच प्रसूती पश्चात बाळाचे संगोपन करताना आवश्यक असणारे प्रत्येक बारीक सारीक गोष्टीसाठी लागणारे मार्गदर्शन देखील वैद्या मंजिरी जोग करतात.
प्रसूती होण्यापूर्वी मातांवर असणारा मानसिक ताण हा बाळावरही येत असतो. या ताणतणावाचे व्यवस्थापन करता येणेही आवश्यक असते. अशा अनेक गोष्टींचे फायदे या गर्भसंस्काराच्या दरम्यान माता आणि बाळ या दोघांना मिळत असतात. अत्यंत नाममात्र शुल्कात ही सेवा उपलब्ध असून आनंददायी मातृत्वासाठी, सुदृढ बाळाचे स्वप्न साकारण्यासाठी रत्नागिरीतील इच्छुक मातांनी या अंकुर गर्भसंस्कार केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



