… तर पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करणार : भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत

रत्नागिरी : शहरातील सहकारनगर येथील गळती लागलेल्या टाकीबाबत २४ तासात निर्णय न झाल्यास टाकीवर चढून आंदोलन करणार असल्याचं इशारा भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी दिला.
शहरातील प्रभाग क्रमांक सहामध्ये पाण्याच्या टाकीला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने याचा परिणाम आजूबाजूच्या प्रभाग क्रमांक पाच व सहा मधील पाणी पुरवठ्यावर होऊ लागला आहे. काल (२६ नोव्हेंबर) भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष या टाकीची पाहणी करून तेथील परिस्थिती पाहिली व आजूबाजूच्या नागरिकांशी संवाद देखील साधला व याबाबत तातडीने उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नीलेश आखाडे, शैलेश बेर्डे, नितीन गांगण यांनी तेथील स्थानिकांना सांगितले.
आज भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी रत्नागिरी नगर परिषदेला धडकले व तेथील अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. त्यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आक्रमक झालेले पाहायला मिळाले. या टाकीबाबत २४ तासाच्या आत ठोस निर्णय न झाल्यास नगरपालिका प्रशासनाने याबाबत उपाययोजना न केल्यास या टाकीवर चढून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आंदोलन करतील असा इशारा सावंत यांनी दिला आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष सावंत यांच्यासह महिला जिल्हाध्यक्षा वर्षाताई ढेकणे, जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे, दादा ढेकणे, प्रभाग क्रमांक पाच आणि सहा मधील नीलेश आखाडे, शैलेश बेर्डे, सायली बेर्डे, सौ. दळी, संदीप सुर्वे, राधा हेळेकर, महिला अध्यक्ष पल्लवी पाटील, मंदार मयेकर, मंदार खंडकर, अमित विलणकर आदी उपस्थित होते.



