कारवांचीवाडी रस्त्यासाठी रस्ता रोको व उपोषणाचा इशारा

रत्नागिरी : शहाजवळील धोकादायक बनलेल्या कारवांचीवाडी येथील रस्ता त्वरित करण्यासंदर्भात कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले असून, येत्या १४ दिवसांत रस्ता न झाल्यास रास्ता रोको, उपोषण करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
कारवांचीवाडी रस्ता अत्यंत धोकादायक बनला असून त्या रस्त्यावर वाहने तर सोडाच चालणेही अशक्य बनले आहे. त्या रस्त्यावर जिवघेणे अपघात बारंवार होत आहेत.तेथील नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही.

याबाबतीत चौकशी करण्यासाठी तेथील रहिवाशी व भाजपा महिला मंडल अध्यक्षा सौ. प्रियल जोशी यांचे पुढाकाराने जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे, प्रमोद कांबळे, सौ. बने, ऋषीकेश केळकर, रसिक कदम यांनी कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात धडक मारली व त्यांना हा रस्ता त्वरीत करण्यासंबंधी निवेदन दिले. तसेच हा रस्ता १४ दिवसांत न झालेस रास्ता रोको, उपोषण करण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला. या रस्त्यासंदर्भात मंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत यांनी त्वरीत दखल घेतली व रस्ता १ आठवड्यात करण्याच्या सूचना संबंधिताना दिल्या.



