मुख्य बातमी

रत्नागिरी पालिकेच्या पाण्याच्या टाकीला मोठी गळती 

पालिकेचे दुर्लक्ष : भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा पाठपुरावा 

रत्नागिरी : शहरातील सहकारनगर परिसरात असलेल्या नगरपालिकेच्या मोठ्या पाण्याच्या टाकीला गळती लागली असून याचा फटका आजूबाजूच्या परिसरातील गावांना बसत आहे. याबाबत भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी पाठपुरावा करायला सुरुवात केली असून लवकरच यावर मार्ग काढला जाईल असे सांगण्यात आले.

नगर पालिकेच्या हद्दीत येणाऱ्या सहकार नगर येथे असलेली मोठ्या पाण्याच्या टाकीला मोठी गळती लागली आहे. याचा फटका प्रभाग क्रमांक ५ व ६ मधील रहिवाशांना बसत आहे. या पाण्याच्या गळतीमुळे आजूबाजूच्या परिसरातील सहकार नगर, राजेंद्र नगर, नूतननगर, साळवी स्टॉप, नरहर वसाहत, विश्वनगर, आंबेशेत, आनंद नगर, मारुती मंदिर परिसरातील लोकांना पाण्याच्या समस्याला अनेकदा तोंड द्यावे लागत असून, अतिशय कमी दाबाने पाणी मिळत आहे. याचे कारण काय हे शोधताना भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा पदाधिकारी यांनी याबाबत पाठपुरावा सुरू केला आहे.

यावेळी अनेक स्थानिकांनी या पाण्याच्या टाकीबाबत सांगितले. भाजपा शहर खजिनदार शैलेश बेर्डे, आयटी जिल्हा संयोजक नीलेश आखाडे, भाजपा महिला मोर्चा पदाधिकारी सायली बेर्डे, जिल्हा पदाधिकारी नितीन गांगण, ओबीसी मोर्चा महिला जिल्हाध्यक्ष प्राजक्ता रूमडे आदींनी रात्री आठच्या सुमारास सहकार नगर येथे असलेल्या पाण्याच्या टाकीला अचानक भेट दिली. व तेथील वस्तुस्थितीची पाहणी केली आणि आजूबाजूच्या रहिवाशांशी संपर्क साधत त्यांच्याशी याबाबत चर्चा केली.

प्रत्यक्ष भेट दिली तेव्हा देखील टाकीतून लाखो लिटर पाणी वाया जात होते. या टाकीला गेले अनेक वर्ष गळती लागली असून दररोज हजारो लिटर पाणी यातून वाया जात असल्याचे समोर आले आहे. अनेकदा मागणी करून देखील रत्नागिरी पालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे, असे तेथील स्थानिकांनी सांगितले. तेथील स्थानिक श्री. आंबर्डेकर, श्री. हर्चेकर, श्री. कुवर, श्री. भाटवडेकर, श्री. बेहेरे, श्री. जोशी आदींनी तेथील समस्यांचा पाढा भाजपा पदाधिकाऱ्यांसमोर वाचला. उपस्थित भाजपा पदाधिकारी शैलेश बेर्डे, नीलेश आखाडे, नितीन गांगण यांनी याबाबत आम्ही त्वरित उपाययोजना करण्यासाठी पाठपुरावा करणार असून लवकरच याबाबत ठोस उपाय योजना करावी, अशी मागणी करीत आहोत असे तेथील उपस्थितांना सांगितले.

रत्नागिरी नगरपालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहत त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी भाजपा पदाधिकारी आणि तेथील स्थानिक रहिवासी यांनी केली आहे. मुख्याधिकाऱ्यांशी बोलून यावर त्वरित मार्ग काढणार असल्याचे शैलेश बेर्डे, नीलेश आखाडे यांनी स्थानिकांना बोलताना सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button