वन्यजीव रक्षक कै. नीलेश बापट यांची २२ सप्टेंबर रोजी शोकसभा

चिपळूण : संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील निसर्ग संवर्धनाच्या कामातील अग्रणी कार्यकर्ते, तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक नीलेश बापट यांचे १४ सप्टेंबर रोजी निधन झाले. नि:स्वार्थी कार्यकर्त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी रविवारी (२२ सप्टेंबर) सायंकाळी ४ वाजता ब्राह्मण सहाय्यक संघ, बेडेकर सभागृह, वीरेश्वर कॉलनी, चिपळूण येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
कै. बापट यांचे निसर्ग क्षेत्रातील तसेच सामाजिक क्षेत्रातील काम हे खूप मोठे आहे. अत्यंत नि:स्वार्थी हेतूने काम करणाऱ्या या निसर्गसेवक कार्यकर्त्याच्या अकाली निधनामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुःखातून त्यांनी लवकरात लवकर सावरावे या हेतूने, तसेच कै. नीलेश यांचा महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात मोठा मित्रपरिवार असून त्याच्या अकाली जाण्यामुळे हा मित्रपरिवार शोकमग्न आहे.
कै. नीलेश यांच्या निसर्ग क्षेत्रातील कार्याला समजून घेण्यासाठी, त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, तसेच कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी सर्वांनी या शोकसभेसाठी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन या शोकसभेचे संयोजक निसर्ग कार्यकर्ते, ग्लोबल संस्थेचे सर्व कार्यकर्ते आणि नीलेश बापट मित्रपरिवार, चिपळूण यांच्यावतीने करण्यात आले आहे.



