कर्जदारांनी ७ सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणीकरण करावे : जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९

रत्नागिरी : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ अंतर्गत आधार प्रमाणीकरण करणे बाकी असलेल्या सर्व कर्जदारांनी १२ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर २०२४ या कालावधीत नजिकच्या आपले सरकार सेवा केंद्र, सी.एस.सी सेंटर अथवा बँक शाखेत संपर्क करून आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था डॉ.सोपान शिंदे यांनी केले आहे.
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरलेल्या (विशिष्ट क्रमांक देण्यात आलेल्या) परंतु, आधार प्रमाणीकरण न झालेल्या शेतकऱ्यांसाठी महा-आयटी यांनी १२ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या कालावधीत संबंधीत शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे, त्याबाबत लघु संदेश शेतकऱ्यांना महा-आयटी मार्फत देण्यात आला आहे.
या योजने अंतर्गत जिल्ह्यातील सर्व बँकांनी प्रोत्साहनपर लाभासाठी २८ हजार ८७६ कर्जदार शेतकऱ्यांचे खाती अपलोड केली आहेत. त्यापैकी १७ हजार ९४९ कर्जदार शेतकऱ्यांचे खात्यांना विशिष्ट क्रमांक प्राप्त झाले आहेत आणि त्यापैकी १६ हजार ९३९ आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले असून अद्याप १ हजार ८ कर्जदार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करणे प्रलंबित आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण केल्या पैकी १६ हजार २६७ पात्र लाभार्थ्यांच्या बँक खाती ३२.४२ कोटी इतकी रक्कम शासनामार्फत अदा करण्यात आली आहे.



