केळकर मुलींच्या वसतीगृहातील कक्षाचे पटवर्धन कक्ष नामकरण

रत्नागिरी : अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ या संस्थेच्या कै. आनंदीबाई त्रिविक्रम केळकर मुलींच्या वसतीगृहातील एका कक्षाचे पटवर्धन कक्ष नामकरण असे करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम मंडळाच्या वर्धापनदिनी उद्या (ता. २७ मार्च) सायंकाळी ४ वाजता करण्यात येणार आहे.
या संस्थेचा ९१वा वर्धापनदिन बुधवार २७ मार्च रोजी सायंकाळी ४.३० ते ७ या वेळेत जोशी पाळंद येथील मंडळाच्या भगवान परशुराम सभागृहात होणार आहे. या वेळी विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मंडळाचे पदाधिकारी, पटवर्धन कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत. कै. सुमती अच्युत पटवर्धन (ठाकूरद्वार, मुंबई) यांनी केलेल्या इच्छापत्रानुसार रू. ४ लाख एवढी रक्कम त्यांनी मुलींच्या वसतीगृहासाठी दिली आहे. कै. सुमतीताईंचे यजमान कै. अच्युत वासुदेव पटवर्धन हे सराफ होते. तसेच त्यांचे आजोबा कै. लक्ष्मण विठ्ठल पटवर्धन हे ब्रिटीश काळात धातूतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. या पटवर्धन कुटुंबाचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कुटुंबाशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. पटवर्धन कुटुंबाचे मूळ गाव रत्नागिरी शहराजवळील काजरघाटी (पोमेंडी खुर्द) हे आहे.
कार्यक्रमविषयी :
दिनांक : बुधवार, २७ मार्च २०२४
वेळ : सायंकाळी ४.३० ते ७
स्थळ : भगवान परशुराम सभागृह, अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ, जोशी पाळंद, रत्नागिरी.



