प्रशासनाचे काम एक पाऊल पुढे हवे : सीईओ कीर्ती किरण पूजार
पत्र सूचना कार्यालयातर्फे "वार्तालाप" ग्रामीण माध्यम परिषद संपन्न

कोरत्नागिरी : “कोकणातील लोक ही माहितीने परिपूर्ण असून अप टू डेट असल्याचे इथे काम करताना निदर्शनाला आले आहे. त्यामुळे प्रशासनाचे कामही एक पाऊल पुढे असायला हवे,” असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले.
केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पत्र सूचना कर्यालयामार्फत पत्रकारांसाठी आयोजित केलेल्या वार्तालाप या ग्रामीण माध्यम परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. हा कार्यक्रम शासकीय विश्रागृहासमोरील हॉटेल सिल्व्हर स्वान येथे झाला. या वेळी व्यासपीठावर भारतीय तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्षक गिरीश चंदर, कौशल्य विकास मंत्रालयाचे सहसंचालक अभय महिषी, पर्यटन मंत्रालयाचे (मुंबई) प्रादेशिक संचालक डी. व्यकंटेशन, पत्र सूचना कार्यालयाच्या उपसंचालक जयदेवी पुजारी-स्वामी, सहाय्यक संचालक निकिता जोशी उपस्थित होत्या.
श्री. पूजार म्हणाले, “शासकीय योजना तळागाळात प्रभावीपणे पोचवण्यात पत्रकारांचा मोठा वाटा आहे. जिल्हा परिषदमार्फत विविध योजनांची अंमबजावणी केली जात असते. मात्र काहीवेळा प्रशासनही गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोचत नाही अशावेळी बाकीच्या गोष्टींबरोबरच मीडियाची मोठी मदत होते. प्रशासन सामाजिक माध्यमाच्या माध्यमातून लोकांशी संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहे. तंत्रज्ञानामुळे वेगाने बातमी पसरते; मात्र ती खरी आहे की खोटी याची पडताळणी करूनच ती फॉरवर्ड करायला हवी. तंत्रज्ञानाचा वापर करून चांगली आणि उपयोगी माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा.”
“मीडियाचे बातमी सांगण्याचे माध्यम बदलत आहे. तंत्रज्ञानामुळे ते वेगवान झाले आहे. त्यादृष्टीने पत्रकारांनाही कौशल्ये विकसित करायला लागत आहेत. ग्रामीण भागातील पत्रकारांना वार्तालापच्या माध्यमातून चांगले व्यासपीठ पत्र सूचना कार्यालयाने उपलब्ध करून दिले आहे. याचा ग्रामीण पत्रकारांना निश्चितच फायदा होईल. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याने सगळ्यांनी एकत्रित काम केले, तर अजून बळकटी मिळेल”, असे त्यांनी सांगितले.

भारतीय तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्षक श्री. चंदर यांनी आपला माध्यमांशी संवाद चांगला असेल, तर गरज पडेल तेव्हा आपले नियोजन कार्यान्वित करण्यासाठी आपल्याला त्यांची चांगली मदत होऊ शकते असे सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलनाने झाली. प्रास्ताविक करताना पत्र सूचना कार्यालयाच्या जयदेवी स्वामी यांनी कार्यालयाच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला. आभार सहसंचालक निकिता जोशी यांनी मानले.



