महाराष्ट्र सरकारने राज्यात अणूऊर्जा निर्मितीसाठी तब्बल ६.५ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे ऐतिहासिक सामंजस्य करार (MoUs) केले आहेत.

मुंबई :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालय मुंबई येथे महाराष्ट्र शासन (ऊर्जा विभाग) आणि विविध कंपन्यांमध्ये सामंजस्य करार करण्यात आले. मंत्रालयात आयोजित एका बैठकीत अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रामध्ये राज्य शासनासोबत विविध कंपन्यांचे सामंजस्य करार करण्यात आले. एनटीपीसीएल (नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड), अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांचा समावेश आहे.
या बैठकीला पारंपारिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, एनटीपीसी लिमिटेडचे मुख्य महाव्यवस्थापक ए. पी. सामल, अदानी पॉवर कंपनीचे बिझनेस हेड विवेक शर्मा, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या न्यूक्लिअर एनर्जी बिजनेसचे अध्यक्ष रंजय शरण आदी उपस्थित होते. स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्यात येणारी गुंतवणूक ही देशाला संपन्न ऊर्जा राष्ट्र बनवण्यासाठी निश्चितच बळ देणारी ठरणार आहे. राज्यात अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेल्या कंपन्यांना शासनाच्यावतीने संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
या प्रकल्पांमुळे २५,४०० मेगावॅट वीज निर्माण होईल आणि १.२३ लाखाहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.
कोकणातील प्रमुख प्रकल्प आणि कंपन्यांचा तपशील:
रत्नागिरी(बारसू): अदानी पॉवर लिमिटेड (Coastal-Maha Atomic Energy Limited) कडून १.५ लाख कोटी रुपये गुंतवणुकीचा ६,००० मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प
रत्नागिरी (पूर्णगड): रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कडून लहान अणुभट्ट्या (SMRs/Bharat Small Reactors) उभारण्यासाठी ८,००० ते २,००,००० कोटी रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीचा करार
सिंधुदुर्ग (देवगड): NTPC लिमिटेड कडून १ लाख कोटी रुपये गुंतवणुकीचा ४,००० ते ७,२०० मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प
इतर: ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लि. (बजाज समूह) कडून २ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक.
हे प्रकल्प पूर्ण झाल्यावर राज्याची ऊर्जेची गरज भागेलच, शिवाय महाराष्ट्र ‘नेट झिरो’ (शून्य कार्बन उत्सर्जन) उद्दिष्टपूर्तीकडे वेगाने वाटचाल करेल.
रत्नागिरी (बारसू): अदानी पॉवर लिमिटेड
– प्रस्तावित स्थापित क्षमता – ६००० मेगावॅट
– प्रस्तावित गुंतवणूक – ₹१,५०,००० कोटी
– प्रत्यक्ष+अप्रत्यक्ष रोजगार संधी : ४,५०० + ७,५०० = १२,०००
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड पूर्णगड जि. रत्नागिरी येथे ‘भारत स्मॉल रिॲक्टर्स’ / स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर (SMR)/ अणुऊर्जा रिॲक्टर प्रकल्प उभारण्यासाठी सामंजस्य करार.
– प्रस्तावित स्थापित क्षमता: २ X २२० मेगावॅट ते ६ X १२०० मेगावॅट
– प्रस्तावित गुंतवणूक: ₹८,००० ते ₹२,००,००० कोटी
– प्रत्यक्ष + अप्रत्यक्ष रोजगार करार: ३००० + १,००,००० = १,०३,०००
राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ लिमिटेड (एनटीपीसी) सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड येथे अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी सामंजस्य करार.
– प्रस्तावित स्थापित क्षमता: एकूण ६ युनिट्सद्वारे ४,००० ते ७,२०० मेगावॅट.
– प्रस्तावित गुंतवणूक: ₹१,००,००० कोटी
– प्रत्यक्ष + अप्रत्यक्ष रोजगार करार: ५०००



