महावितरणचा प्रधानमंत्री सूर्यघर योजनेला ‘झटका’?

महावितरणचा प्रधानमंत्री सूर्यघर योजनेला ‘झटका’?
पुणे : केंद्र सरकारने पंतप्रधान सूर्यघर योजनेंतर्गत देशातील एक कोटी घरांवर सौरयंत्रणा बसवून त्यांचे वीजबिल शून्यावर आणण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. मात्र, महावितरणने वीज नियामक आयोगाकडे दिलेल्या प्रस्तावानुसार सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत वापरण्यात येणाऱ्या घरगुती विजेवर सवलत दिली जाणार आहे. मात्र, सायंकाळी ६ ते सकाळी ९ या वेळेत वीज वापरल्यास वीज बिल भरावे लागणार असल्याने महावितरणकडून प्रधानमंत्री सूर्यघर योजनेलाच ‘झटका’ देण्यात आला आहे.
द सोलर सिस्टीम इंटिग्रेटर्स असोसिएशनचे (टीएसएसआयए) महाराष्ट्र राज्य अध्यक्ष जयेश अकोले यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी महाराष्ट्र सोलार मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (मास्मा) चे अध्यक्ष शशिकांत वाकडे, समीर गांधी, संजय कुलकर्णी, जयंत राव उपस्थित होते. सजग नागरिक मंंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनीही महावितरणच्या या प्रस्तावाला विरोध केला आहे. दरम्यान, महावितरणकडे याबाबत विचारणा केली असता हा विषय आयोगाकडे प्रस्तावित असून लवकरच खुलासा करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
महावितरणने नुकत्याच सादर केलेल्या वीजदरवाढ प्रस्तावात कमी मागणी असलेला काळ म्हणून सकाळी ९ ते सायंकाळी ५ ही वेळ ठरवली आहे. त्यामुळे या काळात तयार झालेली सोलार वीज त्याच वेळेत वापरली नाही तर ती फक्त खात्यात दिसत राहील. वर्षाच्या शेवटी तेवढ्या युनिट्सच्या ८८ टक्के युनिट्सचे ३ किंवा ३.५० रुपयांप्रमाणे पैसे मिळतील. मात्र, ग्राहक संध्याकाळी ६ ते सकाळी ९ या मुख्य वेळेत जी वीज वापरेल त्याचे त्याला बिल भरावेच लागणार आहे. परिणामी, सोलर सिस्टीम बसवल्यामुळे वीजबिल शून्यावर येण्याचे त्याचे स्वप्न भंग पावेल. यातून ग्राहकांचा प्रधानमंत्री सूर्यघर योजनेला मिळणारा प्रतिसादही कमी होईल.



