पतितपावन मंदिराची पुर्नबांधणी करण्याच्या हालचाली
भंडारी समाजासह अठरापगड जातीतील बंधू-भगिनीत संतापाची लाट

रत्नागिरी : पततपावन मंदिराची पुर्न:उभारणी करून दानशुर भागोजीशेठ कीर यांचा थोर इतिहास नष्ट करणार की काय, असा संतप्त सवाल भंडारी समाजातील बंधू-भगिनींतून करण्यात येत आहे. एकीकडे पतितपावन मंदिर वि. दा. सावरकरांनी बांधले, असा चुकीचा इतिहास शालेय पाठ्यपुस्तकातून शिकवला जात असताना आता त्यांचा खरा इतिहासच पुसून टाकण्याचा हा डाव तर नाही ना? असा सवालही रत्नागिरीवासीयांतून करण्यात येत आहे. दरम्यान या हालचालींमुळे भंडारी समाजासह भागोजीशेठ कीर प्रेमींमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
रत्नागिरी शहरातील पतितपावन मंदिराची पुर्न:उभारणी व परिसराचे सुशोभीकरण करण्याबाबतचे वृत्त सोशल मीडियावर झळकल्यानंतर मंगळवारी रत्नागिरी शहरातील भंडारी समाज बांधवांतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. एका लोकप्रतिनिधींसह बांधकाम विभागाचे ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी पतितपावन मंदिराच्या माघी गणेशोत्सवादरम्यान भेट दिली. यावेळी संबंधित पदाधिकार्यांसह मंदिराच्या पुर्न:उभारणी आणि सुशोभिकरणाबाबत चर्चा झाल्याचे बोलले जात असून याठिकाणी सावरकरांचे स्मारकही उभारले जाईल,अशी ग्वाही दिल्याचेही बोलले जात आहे.
या आशयाचे वृत्त सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्यानंतर भंडारी समाजासह अठरा पगड जातीतील लोकांना मोठा धक्का बसला. पतितपावन मंदिर कोणी बांधले? हा वाद संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असताना भागोजीशेठ कीर यांनी स्वत: जागा खरेदी करून बांधलेले हे ऐतिहासिक मंदिरच नव्याने बांधण्याची सुपीक आयडीया कोेणाच्या डोक्यातून आली? लोकप्रतिनिधींना कार्यक्रमाला आमंत्रित करून आपले इप्सित साध्य करण्याचा तर हा डाव नाही ना, असा सवालही रत्नागिरीकरांतून उपस्थित होत आहे.
प्रजासत्ताक दिनी झाले होते उपोषण
पतितपावन मंदिर नेमके कुणी बांधले दानशूर भागोजीशेठ कीरांनी की सावरकरांनी, हा वाद अनेक वर्षे धुमसत आहे. आठवीच्या शालेय पाठ्यपुस्तकात स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी रत्नागिरी येथे हिंदू धर्मातील सर्व जातींना मुक्त प्रवेश असणार्या पतितपावन मंदिराची निर्मिती केली. सहभोजनाआदी कार्यक्रम राबवले, असा उल्लेख करण्यात आला आहे. याला भंडारी समाजासह अठरापगड जातीतील समाजबंधू-भगिनींनी तीव्र आक्षेप घेतला आहे. मुळात पतितपावन मंदिरासाठी वरच्या आळीत स्वत:च्या पैशाने जागा खरेदी करून याठिकाणी भागोजीशेठ कीर यांनी पतितपावन मंदिराची निर्मिती केली. सावरकरांनी त्यांना मंदिर उभारण्याची विनंती केल्यानंतर भागोजीशेठ कीर यांनी स्वखर्चाने ते बांधले, हा खरा इतिहास आहे.
शालेय पाठ्यपुस्तकात मात्र भलतेच शिकवले जात आहे. त्यासाठीच रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघासह अठरा पगड जातीतील नेतेमंडळींनी २६ जानेवारीला उपोषण केले होते. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी संंबंधित खात्याच्या मंत्र्यांशी आपली भेट घडवून चुकीची दुरुस्ती करण्यास भाग पाडू, असे आश्वासन दिले होते. एकीकडे पालकमंत्र्यांनी ठोस आश्वासन दिलेले असताना दुसरीकडे भागोजीशेठ कीरांचा दैदिप्यमान इतिहासच पुसून टाकण्याचा प्रयत्न सुरू झाल्याने सारे चक्रावले आहेत.



