
रत्नागिरी : मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरणारी टोळी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. टोळीतील चौघांना बेड्या ठोकण्यात आल्या असून त्यांच्याकडून पाच गुन्हे उघडकीला आले आहेत. तसेच त्यांच्याकडून ६ लाख २७ हजार किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पावस व रत्नागिरी शहर परिसरामध्ये मोबाईल टॉवर बॅटऱ्या चोरी चे अनेक प्रकार मागील अनेक दिवसांपासून सुरु होते. याबाबत पुर्णगड सागरी पोलीस ठाणे व रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले होते. पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांनी तात्काळ एक पथक तयार करून या पथकाला मोबाईल टॉवर बॅटरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या.
या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे राहुल कुंदन तोडणकर (२९, रा. शिवलकरवाडी, आलावा जाकिमिऱ्या रत्नागिरी) शुभम नीलेश खडपे (२४, रा. गोडावून स्टॉप नाचणे, रत्नागिरी), मुस्तफा गुड्डु पठाण (२२, रा. गोडावून स्टॉप नाचणे, रत्नागिरी) विकास महेश सुतार (१९, रा. थिबा पॅलेस गार्डनच्या बाजुला, रत्नागिरी) यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता नमूद आरोपीत यांनी पावस व रत्नागिरी या परिसरामध्ये विविध ठिकाणी मोबाईल टॉवरच्या बॅटरी चोरी केल्याची कबुली दिली आहे.
आरोपींकडून चोरीस गेलेला मुद्देमाल व गुन्हा करणेकामी वापरलेली वाहने व साहित्य असा एकूण ६ लाख २७ हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.



