मुख्य बातमी

सूर्यमंदिराचे कशेळी होणार सोलर व्हिलेज

६१६ कुटुंबांशी संवाद; प्रत्येकाला मिळणार अनुदान

राजापूर : भारतामधील तीन प्रमुख सूर्यमंदिरांपैकी एक मंदिर राजापूर तालुक्यातील करोळी येथे आहे. हे गाव पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे सोलर व्हिलेज ही संकल्पना या गावापासून राबवण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. या गावातील ६१६ कुटुंबांशी नुकताच संवाद साधला असून सर्वांनी सकारात्मक प्रतिसादही दिला आहे. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला अनुदानही दिले जाणार आहे.

प्रधानमंत्री सूर्यघर योजनेंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी कशेळी येथे बैठक घेतली. केंद्र सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पात सौरऊर्जा योजनेची घोषणा केली आहे. त्यामध्ये ४० टक्केपर्यंत सबसिडी मिळणार आहे. यामध्ये एक वॅट विजेसाठी ३० हजार रुपये, २ वॅटसाठी ६० हजार रुपये तर ३ वॅटसाठी ७८ हजार रुपये सबसिडी शासनाकडून दिली जाणार आहे.

शासनाने मंजुरी दिलेल्या कोणत्याही एजन्सीद्वारे लाभार्थी सोलर युनिट बसवू शकतो, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. ही योजना राबवण्यापूर्वी गावातील घरे, कुटुंबे, मंदिरे, दुकाने, कार्यालये यांचा सर्वे करण्यात आला होता. त्यानुसार कशेळी गावात ३१६ घरे असून, ६६५ कुटुंब आहेत. एक पॅनल बसवण्यासाठी सर्वसाधारण १ लाख ७० हजार रुपये खर्च येतो. कशेळी गावातील सर्वच कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी बँकांमार्फत कर्जयोजनेतून किंवा महावितरणकडून अन्य लाभ देता येतात का, याबाबतची माहिती ग्रामस्थांना दिली गेली. पावसाळ्यात सोलरमधून वीजनिर्मितीत कोणत्या अडचणी येतात का, असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला होता. त्यावर कोणताही परिणाम होत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच सोलरचा सूर्याशी संबंध असल्यामुळे कशेळी गावाची निवड केल्याचे या वेळी कृषी अधिकारी खरात यांनी सांगितले.

या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. डी. यादव, उपविभागीय अधिकारी डॉ. जॅस्मिन, कृषी विकास अधिकारी सुनील खरात, तहसीलदार विकास गंबरे, गटविकास अधिकारी निलेश जगताप, कृषि अधिकारी परेश सुर्वे, कृषी विस्तार अधिकारी प्रथमेश पाटील यांच्यासह बँक, महावितरण आणि अन्य खात्यांचे अधिकारी कशेळी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

” कशेळी गावामध्ये कनकादित्य मंदिर असल्यामुळे पर्यटनदृष्ट्या वेगळे महत्त्व आहे. हाच विचार करून शंभर टक्के गाव सोलर व्हिलेज बनवण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेच्या निकषांची माहिती दिली. यावर 3 महिन्यात कार्यवाही होणार आहे. पहिल्या टप्प्यात ५० टक्के लाभ घेणार आहे, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी सांगितले.

दृष्टिक्षेपात कशेळी गाव

एकूण घरांची संख्या : ६१६

• कुटुंबांची संख्या : ९६५

• अंगणवाडी संख्या : ६

• शाळांची संख्या : ५

• मंदिरांची संख्या :७

• शासकीय इमारती: ३

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button