रत्नागिरीत ३ ते ५ जानेवारीदरम्यान चाचा नेहरु बाल महोत्सव

रत्नागिरी : जिल्ह्यातील बाल कल्याण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शासकीय/स्वयंसेवी संस्थामध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ निराधार उन्मार्गी मुलांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभाव व सांघिक भावना निर्माण होण्यासाठी दरवर्षी चाचा नेहरू बाल महोत्सव आयोजित करण्यात येतो. यावर्षी हा बाल महोत्सव ३ जानेवारी ते ५ जानेवारी २०२५ या कालावधीत छत्रपती शिवाजी स्टेडियम, मारुती मंदिर येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांनी दिली.
या महोत्सवात संस्थाबाह्य (नगरपालिका शाळांमधील) मुलेही सहभागी होणार आहेत. बाल महोत्सवात क्रिकेट, खो-खो, कबडडी, गोळाफेक, लांब उडी, १०० मीटर धावणे, ४ x १०० मीटर रिले, कॅरम, बुद्धिबळ, निबंध, चित्रकला, हस्ताक्षर, वक्तृत्व, अशा क्रीडा स्पर्धा तसेच सामूहिक नृत्य, सामूहिक गायन, नाटीका, वैयक्तिक नृत्य, वैयक्तिक गायन आदी सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात येणार आहेत.



