मुख्य बातमी

सागर महोत्सवातील विविध कार्यक्रमांची घोषणा

आसमंत बेनवोलन्स फाउंडेशनतर्फे ९ ते १२ जानेवारीला आयोजन

रत्नागिरी : आसमंत बेनेवोलन्स फाउंडेशन आयोजित तिसऱ्या सागर महोत्सवात अभ्यासपूर्ण व्याख्याने, परिसंवाद, लघुपट सादरीकरण आणि समुद्रकिनारा सहल, कांदळवन क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवातील विविध कार्यक्रम आसमंतचे संस्थापक संचालक नंदकुमार पटवर्धन यांनी जाहीर केले. ९ ते १२ जानेवारी दरम्यान हा महोत्सव होणार आहे.

आसमंत फाउंडेशन ११ वर्षांहून अधिक काळ, मुलं, निसर्ग, पर्यावरण आणि शास्त्रीय संगीत या घटकांचे पालनपोषण करण्यात अग्रेसर भूमिका बजावत आहे. महोत्सवामध्ये गोगटे- जोगळेकर महाविद्यालय, दापोली कृषी विद्यापीठाचे शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालय, राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था (गोवा), गोखले इन्स्टिट्यूट, सेंटर फॉर ससस्टेनेबल डेव्हलपमेंट (पुणे), इकॉलॉजिकल सोसायटी (पुणे), कोस्टल कॉन्झर्वेशन फौंडेशन (मुंबई) यांचा तांत्रिक सहभाग आहे.

९ जानेवारी रोजी महोत्सवाचे उद्घाटन सकाळी ९ वाजता मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. उद्धाटनानंतर लगेच प्रमुख पाहुणे विश्व विख्यात शास्त्रज्ञ डॉ. के. कथीरेसंन यांचे व्याख्यान होईल. सकाळी ११.१५ वाजता प्रवचनकार श्रीनिवास पेंडसे यांचे “महासगराचे अध्यात्मिक महत्व” या विषयावर प्रवचन होईल. दुपारी १२ वाजता राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. समीर डामरे यांचे सागरी बुरशी या विषयावर व्याख्यान होईल. दुपारी २ वाजता दृक्श्राव्य लघुपट दाखवण्यात येईल. दुपारी २.३० वाजता राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नरसिंह ठाकूर यांचे मरिन बायोप्रॉस्पेकटिंग या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. दुपारी ३.४५ वाजता भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेच्या डॉ. मेधा देशपांडे यांचे अरबी समुद्रातील चक्रीवादळे या विषयावर व्याख्यान होईल. संध्याकाळी ५ वाजता एमटीडीसीचे हनुमंत हेडे यांचे शाश्वत पर्यटन या विषयावर व्याख्यान होणार आहे.

१० जानेवारीला सकाळी ६.४५ वाजता भाट्ये समुद्र किनाऱ्यावर पुळणी किनारा अभ्यास फेरीत प्रदीप पाताडे आणि डॉ. अमृता भावे मार्गदर्शन करतील. सकाळी १० वाजता प्रा. प्र. के. घाणेकर यांचे सागरी किल्ले आणि परिसंस्था या विषयावर व्याख्यान आणि सकाळी ११.१५ वाजता राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे डॉ. सुहास शेट्ये यांचे सागरी वातावरणातून कार्बन मिळवणे या विषयावर व्याख्यान होणार आहे. दुपारी १२ वाजता सी बोट प्रात्यक्षिक होणार असून रोबो सोडून समुद्राच्या तळाला असलेल्या जैवविविधतेचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येईल. दुपारी २ वाजता दृक्श्राव्य लघुपट दाखवण्यात येतील. दुपारी २.३० वाजता डॉ. प्राची हटकर यांचे सागरी सस्तन प्राणी संवर्धन – डगोंगची (समुद्र गायीची भूमिका) या विषयावर व्याख्यान आणि दुपारी ३.४५ वाजता प्रा. सतीश खाडे यांचे सागराची काळजी का घ्यावी या विषयावर व्याख्यान होईल. दुपारी ४.४५ पासून पेठकिल्ला येथे खडकाळ किनारा अभ्यास फेरी आयोजित केली असून यात प्रदीप पताडे आणि डॉ. अमृता भावे माहिती देतील.

११ जानेवारीला सकाळी ६.४५ वाजता भाट्ये समुद्र किनाऱ्यावर पुळणी समुद्र अभ्यास फेरी असून यात प्रदीप पताडे आणि डॉ. अमृता भावे तिथल्या जैवविविधतेची माहिती देतील. सकाळी १० वाजता डॉ. विशाल भावे यांचे समुद्री गोगलगायी या विषयावर व्याख्यान आणि सकाळी ११.१५ डॉ. सायली नेरुरकर यांचा महाराष्ट्रातील आंतरभरतीयुक्त सागरी जैवविविधता धोक्यात आलेला खजिना या विषयावरील त्यांच्या अभ्यासाचा अहवाल त्या सादर करतील. दुपारी १२.३० वाजता दृक्श्राव्य लघुपट दाखवण्यात येतील. दुपारी २.३० वाजता अमित देशपांडे यांचे पर्यावरण जागरूक उपभोक्तावाद या विषयावर व्याख्यान व दुपारी ३.४५ वाजता पूजा साठे यांचा सागरी प्रदूषण या विषयावरील अभ्यासाचा अहवाल सादर होईल. दुपारी ४.४५ पासून पेठकिल्ला येथे खडकाळ समुद्र अभ्यास फेरीत प्रदीप पाताडे आणि डॉ. अमृता भावे मार्गदर्शन करतील.

१२ जानेवारीला सकाळी ७ वाजल्यापासून पासून बोटीतून कांदळवन अभ्यास फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये हेमंत कारखानीस आणि शांभवी चव्हाण मार्गदर्शन करतील.

अधिक माहिती ९८२२२८२३३१/ ९००४०९६२२१/ ९९७००५६५२३ या नंबरशी संपर्क साधावा. महोत्सवातील व्याख्यानांसाठी विद्यार्थी, रत्नागिरीकर अभ्यासू लोकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आसमंतचे संस्थापक संचालक नंदकुमार पटवर्धन यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button