महिला तक्रारी सोडवण्यासाठी १८ डिसेंबरला जनसुनावणी

रत्नागिरी : जिल्ह्यातील महिलांच्या तक्रारींचे स्थानिक स्तरावर सोडवणूक करण्यासाठी बुधवार (१९ डिसेंबर) रोजी सकाळी ११ वाजता नियोजन भवन, तहसीलदार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आवार येथे जनसुनावणीचे आयोजन केली आहे. या जनसुनावणीस आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर स्वतः उपस्थित राहणार आहेत. या जनसुनावणीस पिडीत असलेल्या, समस्या व तक्रारी असणाऱ्या जास्तीत जास्त महिलांनी सुनावणीस सहभाग घेऊन आपल्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, रत्नागिरी यांनी केलेले आहे.
महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांचे कार्यालय मुंबई येथे असल्याने राज्यातील अनेक महिलांना मुंबई येथे पोहोचणे शक्य होत नाही. महिलांना त्यांच्या तक्रारी/समस्या बाबत स्थानिक स्तरावर आपले म्हणणे मांडण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिलेल्या निर्देशानुसार “महिला आयोग आपल्या दारी” या उपक्रमाद्वारे जिल्ह्यातील महिलांच्या तक्रारीची स्थानिक स्तरावर सोडवण्यासाठी जनसुनावणीचे आयोजन केले आहे. यावेळी रूपाली चाकणकर यांच्यासह जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद तसेच विभागीय उपआयुक्त, महिला व बाल विकास, कोकण, मुंबई विभाग हे देखील उपस्थित राहणार आहेत.
या जनसुनावणीमध्ये ३ स्वतंत्र पॅनल तयार करण्यात येणार असून प्रत्येक पॅनलमध्ये सदस्य म्हणून विधी व न्याय प्राधिकरणाचे वकील, संरक्षण अधिकारी, पोलीस अधिकारी, समुपदेशक, महिला व मुलांचे सहाय्य कक्ष, पोलीस अधिकारी, सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी यांचा समावेश करण्यात आला आहे.
या पॅनलद्वारे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे विभागीय कार्यालय कोकण, मुंबई येथे जिल्ह्याच्या प्राप्त तक्रारी व इतर सेवाभावी संस्थेचे समुपदेशन केंद्र यांच्याकडील प्रकरणांचे तसेच ऐनवेळी येणाऱ्या पिडीत महिलांचे तक्रारींचे निराकरण करण्यात येणार आहे.



