रत्नागिरीत पशुगणनेला सुरुवात; पशुधनाच्या १६ प्रजातींची होणार गणना
२८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत राबविणार मोहीम : प्रगणकांना सहकार्य करण्याचे आवाहन

रत्नागिरी : एकविसावी पशुगणना २५ नोव्हेंबर २०२४ ते २८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत होणार आहे. संपूर्ण तालुक्यात एकाच वेळी पशुगणना केली जाणार आहे. ही मोहीम जवळपास तीन महिने राबविण्यात येणार आहे. २८ फेब्रुवारी २०२५पर्यंत घरोघरी जावून माहिती घेणार आहेत. पशुसंवर्धन विभागाची ध्येयधोरणे निश्चित करून विभागामार्फत विविध योजना राबविण्यासाठी पशुगणना कामी येणार असल्याने सर्व नागरिकांनी व पशुपालकांनी प्रगणकांना सहकार्य करावे, असे आवाहन गट विकास अधिकारी जयेंद्र जाधव, सहाय्यक गटविकास अधिकारी चेतन शेळके, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ. आदिती कसालकर यांनी केले आहे.
एकविसावी पशुगणना करण्यासाठी शासनाच्या मागदर्शक सूचनानुसार ग्रामीण भागात ३ हजार कुटुंबामध्ये एक प्रगणक आणि पाच प्रगणकामागे एक पर्यवेक्षक तसेच शहरी भागात ४ हजार कुटुंबामागे एक प्रगणक आणि १० प्रगणकामागे एक पर्यवेक्षक नियुक्ती करण्यात आले आहेत. रत्नागिरी तालुक्यासाठी ग्रामीण व शहरी भागासाठी २८ प्रगणक व ४ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पशुपालन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य आधारस्तंभ आहे. दुध, अंडी, मांस आदींच्या उत्पादनामुळे पोषण सुरक्षेसोबत ग्रामीण उपजिविकेलाही चालना मिळते. पशुपालन क्षेत्राचा शाश्वत विकास घडवण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून पशुपालकांना प्रोत्साहन देते.
पशुगणनेच्या कालावधीत पशुधनाच्या १६ प्रजातींचा म्हणजेच पाळीव प्राणी, कुक्कुटपालन, भटक्या प्राण्यांची पशुगणना करण्यात येणार आहे. पशुगणनेसाठी प्रगणकांनी स्वतःचा मोबाईल ॲप वापरून माहिती संकलित करावी लागणार आहे. यामध्ये गाय, म्हैस, वराह, उंट, घोडा, शेळी, मेंढी, गाढव, हत्ती, मिथुन व कुक्कुट पक्षी जसे की, कोंबडे – कोंबडया, बदक, टर्की ,इमु, क्वेल, गीनी, शहामृग इ. कुक्कुट पक्ष अशा १६ प्रजातींची माहिती संकलित केली जाणार आहे.



