किसान क्रेडीट कार्ड – पशुसंवर्धन व्यवसायास संजीवनी

रत्नागिरी : केंद्र शासनाने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षापासून पशुसंवर्धन विषयक व्यवसाय करणाऱ्या पशुपालकांसाठी किसान क्रेडीट कार्ड योजनेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या योजनेची मुदत ३१ मार्च २०२५ पर्यंत आहे.
या योजनेअंतर्गत कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्धव्यवसाय करीत असलेल्या पशुपालकांकडे स्वतःची किंवा भाडेतत्वावरील गोठा शेड आवश्यक आहे. या क्रेडीट कार्डच्या माध्यमातून पशुसंवर्धन व्यवसायाकरीता लागणारा खाद्य, पशुचिकित्सा खर्च, मजूरी. पाणी, वीज इत्यादीसाठी भांडवली खर्च कर्ज स्वरूपात पुरवठा करण्यात येणार आहे. हे कॅश क्रेडीट दोन लाखापर्यंत ७ टक्के व्याजाने व २ लाखावरील कर्ज ११ टक्के कर्ज स्वरूपात पशुपालकास उपलव्ध होणार आहे. कर्जाची परतफेड विहित मुदतीत व नियमित झाल्यास नाबार्ड कडून ३ टक्के पर्यंत केंद्र शासन व्याज सवलत योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच लाभार्थ्यास४ टक्के दराने कर्ज ज्यांचेकडे पशुधन आहे त्यांना पुढील देखभालीसाठी उपलब्ध होणार आहे. ही योजना कोणत्याही पशुधनाच्या खरेदीकरता नसून त्यांच्या व्यवस्थापनातील खर्चासाठी आहे.
रत्नागिरी तालुक्यातील पशुपालकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी दर शुक्रवारी (शुक्रवारी सुट्टी असल्यास गुरूवारी) तालुका स्तरावर पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती, रत्नागिरी येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजता या वेळेत दोन फोटो, आधारकार्ड झेरॉक्स, रेशनकार्ड झेरॉक्स, सातबारा व ८ अ उतारा, असेसमेंट उतारा ग्रामपंचायत नमुना नं. ८, बँक पासबुक झेरॉक्स, पशुधन असल्याचा दाखला, पॅनकार्ड झेरॉक्स आदी कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. जे. पी. जाधव, गट विकास अधिकारी व डॉ. आदिती कसालकर, पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती रत्नागिरी यांनी केले आहे.



