यांना बर्फाच्या लादीवर झोपवण्याची जबाबदारी माझी : आदित्य ठाकरे
युवासेना प्रमुखांचा दापोली दौरा : विरोधकांवर जोरदार टीका

दापोली : मी सभेसाठी मुद्दाम अशी काही ठिकाणे निवडली आहेत. तुमच्यावर कोणी दादागिरी करत असेल, कोणी हात उचलण्याचा प्रयत्न केला तर थांबा काळजी करू नका आपलं सरकार येतंय त्यांना बर्फाच्या लादीवर झोपण्याची जबाबदारी ही माझी असेल, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला. दापोली विधानसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार संजय कदम यांच्यासाठी आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार भास्कर जाधव, युवा सेनेचे नेते अमोल कीर्तीकर, तालुकाप्रमुख ऋषी गुजर आदी पदाधिकारी उपस्थित होते. तुम्हाला परत गुंडा फुंडांचे सरकार आणायचा आहे का? यांची गुंडगिरी एकाधिकारशाही संपवा, असे सांगत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह शिवसेना नेते रामदास कदम, नारायण राणे यांच्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी दापोलीतील सभेत जोरदार टीका केली आहे. मी लहानपणापासून अनेकांना काका म्हणत होतो; पण त्यांनीच गद्दारी केली असे सांगत त्यांनी रामदास कदम यांच्यावरही निशाणा साधला.

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, आम्ही दिल्लीश्वरांच्या विरोधात लढत आहोत. गुजरातमधून जे आक्रमण होत आहे, त्याच्याविरोधात आम्ही लढत आहोत. आपण सगळे ज्यांना अजूनही कुटुंबप्रमुख समजतो, तसे उद्योजक आजही सांगतात या राज्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नेतृत्व असेल तर राज्यात आम्ही गुंतवणूक घेऊन येऊ, असे सांगत आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर टीका करत उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावरही निशाणा साधला आहे. वेदांत फॉक्सकॉन, बल्कपार्क सारखे मोठे प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेले तेव्हा आम्हाला वाईट वाटले आणि आता हे सरकार हे ४० चोर.. गद्दार.. खोकेबाज… घोटाळेबाज.. खोके काढतात.. धोके देतात.. असे आपल्या सरकारमध्ये नव्हते, अशा शब्दात ठाकरे यांनी शिंदे सरकारवर टीकेची झोड उठवली.
ते पुढे म्हणाले की , कोविड काळात आम्ही कधी कोणत्याही कामगारांना वाऱ्यावर सोडले नव्हते. आमच्या काळात उद्योग मंत्री विचार करत होते ते फक्त जनतेचा करत होते आणि आताचे उद्योगमंत्री फक्त डांबरात बुडालेले आहेत. ते फक्त स्वतःचा विचार करतात अशा शब्दात आदित्य यांनी मंत्री उदय सामंत यांच्यावर टीका केली आहे. यावेळी शिवसेना रामदास कदम, भाजपाचे ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे यांच्यावरही टीका केली.
राज्यात या गद्दारी विरुद्ध तुम्हाला परिवर्तन घडवायचे असेल तर तुम्हाला एकत्र यावच लागेल आणि लढायला लागेल लढायला तुम्ही तयार आहात का महाराष्ट्र जिंकण्यासाठी तुम्ही तयार आहात का महाराष्ट्र धर्म पाळण्यासाठी तुम्ही तयार आहात का ? परिवर्तनासाठी तुम्ही तयार आहात का? असे प्रश्न उपस्थित करत त्यांनी यावेळी भावनिक आवाहन केले.
जे मागच्या दोन वर्षांत आपल्या राज्यातून पाच लाख रोजगार गुजरातला नेलेत ते पुन्हा आणण्यासाठी तयार आहात का? ते उद्योगधंदे गुजरातला पाठवलेत ते पुन्हा एकदा आणण्यासाठी तयार आहात का? हे महाराष्ट्रात खोके धोके हे राजकारण आहे, जे गद्दारी झालेली आहे त्याला हद्दपार करण्यासाठी तयार आहात का, असासवाल करत परिवर्तन आणायचे असेल तर २० तारखेला तुम्हाला मतदान करायला लागेल आणि त्या मतदानाची निशाणी मशाल सांगा कोणती असे विचारत त्यांनी उपस्थितंकडून मशाल चिन्ह हे दोन ते चार वेळा वदवून घेतले.



