कार्तिकी एकादशीनिमित्त रत्नागिरी शहरातील वाहतुकीत बदल
रामनाका ते गाडीतळ, काँग्रेसभवन नाका दरम्यान प्रवेश बंद, पर्यायी मार्गे वाहतूक सुरू राहणार

रत्नागिरी : कार्तिकी एकादशीनिमित्त रत्नागिरी शहरात आज (१२ नोव्हेंबर) पहाटे ४ वाजल्यापासून उद्या (१३ नोव्हेंबर) सकाळी ६ वाजेपर्यंत वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.
रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिर येथे यात्रोत्सव पार पडणार आहे. उत्सवासाठी भविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून, या कार्यक्रमासाठी सुमारे १० ते १२ हजार भाविक येण्याची शक्यता आहे. भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे वाहतूक कोंडी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असल्याने सर्व वाहनांना रामनाका ते गाडीतळ, काँग्रेसभवन दरम्याने प्रवेश प्रतिबंध करणे आवश्यक आहे. या मार्गाला पर्यायी मार्ग म्हणून आठवडा बाजार-काँग्रेस भवन-शेरे नाका-गाडीतळ मार्गे शिरगांव या मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे.
मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम ११५ प्रमाणे वाहतूक बंद करण्याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या पाहणीनंतर रत्नागिरी पोलीस उपविभागीय अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी सादर केलेली वस्तुस्थिती विचारात घेऊन अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी संदर्भ क्र. १ व २ अन्वये प्रदान अधिकारान्वये आदेश देत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.



