शिवसेनेचे दोन तुकडे करणाऱ्यांचा बदला घेण्यासाठी रणांगणात : उदय बने
गेली ४५ वर्षे केवळ आदेशाशीच बांधील ; वरिष्ठ जो आदेश देतील तो शिरसावंद्य

रत्नागिरी : ज्यांनी शिवसेनेचे दोन तुकडे केले त्यांचा बदला घेण्यासाठी म्हणून आम्ही या रणांगणात उतरणार आहोत. त्यासाठी आम्ही इच्छुक असल्याचे वरिष्ठांकडे कळवले आहे; मात्र वरिष्ठ जो निर्णय घेतील त्या आदेशाशी आम्ही बांधील आहोत, असे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय बने यांनी सांगितले.
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवार असलेले उदय बने यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सह संपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक आणि तालुकाप्रमुख बंड्या साळवी उपस्थित होते.
श्री. बने म्हणाले, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद भूषवतानाच शिवसेनेकडून मला विविध काम पदांवर काम करण्याची संधी मिळाली. संघटना वाढीसाठी काम करताना जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख या जबाबदारीच्या पदांवर काम करता आले. त्याचप्रमाणे विविध समित्यांवरही काम पाहिले आहे. ज्यांनी शिवसेनेचे दोन तुकडे केले, ज्यांच्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली त्यांचा बदला घेण्यासाठी त्यांना योग्य तो धडा शिकवण्यासाठी आम्ही रणांगणात उतरणार आहोत. आम्ही इच्छुक असल्याचे वरिष्ठांना कळविले आहे. त्यामुळे वरिष्ठ जो निर्णय घेतील त्या आदेशाशी आम्ही बांधील आहोत. गेली ४५ वर्षे आम्ही आदेशाचे इमाने इतबारे पालन करत आहोत. आदरणीय बाळासाहेब यांच्या विचारामुळेच आजही आम्ही पक्षाशी एकनिष्ठा आहोत आणि आदेशाशी बांधील आहोत त्यामुळे पक्षप्रमुख जो आदेश देतील तो आम्हाला शिरसावंद्य असेल.



