मुख्य बातमी

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा

जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांचे आवाहन

रत्नागिरी : “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन” योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना देशातील महत्त्वाच्या तीर्थ क्षेत्राची मोफत यात्रा करता येणार आहे. या योजनेसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले आहे.

या योजनेंतर्गत भारतातील एकूण ७३ व महाराष्ट्रातील ६६ तीर्थ क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. जवळपास देशातील व राज्यातील सर्व महत्त्वाच्या तीर्थ क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. देशातील मोठ्या तीर्थ यात्रांना जाऊन मनशांती तसेच, अध्यात्मिक पातळी गाठणे सुखकर व्हावे, यासाठी राज्यातील सर्व धर्मीयांमधील ज्येष्ठ नागरिकांना भारतातील तीर्थ क्षेत्रांना मोफत भेटीची दर्शनाची संधी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे. योजनेअंतर्गत निर्धारित तीर्थ क्षेत्रापैकी एका यात्रेसाठी पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ मिळणार आहे. तसेच, प्रवास खर्चासाठी कमाल मर्यादा प्रती व्यक्ती ३० हजार रुपये इतकी राहणार आहे. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास आदी बाबींचा समावेश असेल.

लाभार्थी वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजार असावे. लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा व वय वर्ष ६० वरील ज्येष्ठ नागरिक असावा. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी (३१ ऑक्टोबर २०२४ पूर्वी ऑफलाईन व तद्नंतर ऑनलाईन अर्ज) सादर करावे लागणार आहेत. या योजनेअंतर्गत विविध दळणवळणाच्या साधानांद्वारे प्रवासाचे आयोजन करण्यासाठी अधिकृत टुरिस्ट कंपन्या तसेच IRCTC किंवा समकक्ष अधिकृत असलेल्या नोंदणीकृत कंपन्यांची निवड विहित नियमांचे निविदा प्रक्रियेचे पालन करून करण्यात येईल.

प्रवाशांची निवड जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीद्वारे करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात कोटा निश्चित करण्यात येऊन, प्राप्त झालेल्या अर्जाच्या उपलब्धतेनुसार लॉटरीद्वारे प्रवाशांची निवड करण्यात येणार आहे. ७५ वर्षांवरील अर्जदाराला जीवनसाथी किंवा सहाय्यक यापैकी एकाला त्याच्यासोबत नेण्याची परवानगी असेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button