कै. मृणाल हेगशेट्ये राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन

रत्नागिरी : महाराष्ट्रातील मानाची, नामांकित आणि चार दशकांची दीर्घ परंपरा लाभलेल्या कै. मृणाल हेगशेट्ये राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन दिमाखदार पद्धतीने मोठ्या उत्साहात करण्यात आले.
याप्रसंगी अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. दत्तात्रय वालावलकर, रत्नागिरी नगरपालिका शाळा क्र. १५ दामले विद्यालयाचे शिक्षक योगेश कदम, नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. प्रकाश पालांडे, नवनिर्माण हायच्या माजी मुख्याध्यापिका सौ. नजमा मुजावर, नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ. सीमा हेगशेट्ये, नवनिर्माण हाय इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक डॉ. अरविंद पाटील यांच्यासह स्पर्धक, पालक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज माध्यमिक गटातील मराठी आणि इंग्रजी माध्यमातील वक्तृत्व स्पर्धा झाली. मराठी माध्यमाचे गटाचे परीक्षण शिक्षक योगेश कदम आणि प्रा. प्रकाश पालांडे यांनी, तर इंग्रजी माध्यमाचे परीक्षण प्रा. दत्तात्रय वालावलकर आणि सौ. नजमा मुजावर यांनी केले.
स्पर्धेचे संयोजक प्रा. सचिन टेकाळे यांनी शब्दामध्ये असलेली ताकद आणि शब्दांची किमया प्रास्ताविकातून मांडली. डॉ. जगदाळे यांनी मनोगत व्यक्त करताना नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीचा आणि महाविद्यालयातील उपक्रमांचा थोडक्यात आढावा घेतला. संस्थेच्या संचालिका सौ. हेगशेट्ये यांनी स्पर्धेच्या ४२ वर्षांच्या प्रवासाची माहिती दिली. आजच्या स्पर्धेतून उद्याचा वक्ता तयार व्हावा यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून हे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याने त्या म्हणाल्या.
प्रा. सचिन गिजबिले यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. उमेरा काद्री यांनी आभार मानले. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उद्या (२४ ऑगस्ट) सायंकाळी ४.३० वाजता ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत ज्ञानेश महाराव यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यानिमित्ताने श्री. महाराव यांचे निर्भिड विचार ऐकण्याची संधी रत्नागिरीकरांना मिळणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये यांनी केले आहे.



