जम्मू-काश्मीरसह हरियाणा विधानसभा निवडणुकीची घोषणा

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. जम्मू-काश्मीरमध्ये १० वर्षानंतर प्रथमच विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. याआधी २०१४ साली राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. तर ९० सदस्य संख्या असलेल्या हरियाणा विधानसभेचा कार्यकाळ ३ नोव्हेंबर रोजी संपणार आहे.
मुख्य निवडणूक आयोग राजीव कुमार यांनी जम्मू-काश्मीरमधील ९० जागांसाठी ३ टप्प्यात मतदान होणार असल्याचे जाहीर केले. तर निवडणुकीचा निकाल ४ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे.
जम्मू-काश्मीरमधील मतदानाचे टप्पे
पहिला टप्पा- १९ सप्टेंबर २०२४
दुसरा टप्पा- २५ सप्टेंबर २०२४
तिसरा टप्पा- १ ऑक्टोबर २०२४
जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका घेण्यासंदर्भात ३० सप्टेंबर २०२४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले होते. जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर प्रथमच विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. राज्यात ५ ऑगस्ट २०१९ रोजी कलम ३७० हटवण्यात आले होते.
जम्मू-काश्मीर विधानसभेत ८७ जागा असून २०१४ साली झालेल्या निवडणुकीत पीडीपीने २८, भाजपने २५, नॅशनल कॅन्फरन्सने १५, काँग्रेसने १२ जागा जिंकल्या होत्या. तेव्हा भाजप आणि पीडीपीने मिळून सरकार स्थापन केले होते. मुफ्ती मोहम्मद सईद हे मुख्यमंत्री झाले होते. जानेवारी २०१६ मध्ये त्यांचे निधन झाल्यानंतर ४ महिने राज्यपाल शासन लागू होते आणि नंतर मेहबूबा मुफ्ती या मुख्यमंत्री झाल्या. मात्र हे सरकार जास्त दिवस टीकले नव्हते. १९ जून २०१८ रोजी भाजपने सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि राज्यात राज्यपाल शासन सुरू झाले. सध्या राज्यात मनोज सिन्हा हे उपराज्यपाल आहेत.
यावेळी राज्यातील विधानसभेच्या जागा वाढल्या असून एकूण संख्या ९० इतकी झाली आहे. जम्मूतील जागा ४३ वरून ४७ झाल्या आहेत. राज्यातील २४ जागा पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील आहेत. जेथे निवडणुका घेता येत नाहीत. अशा प्रकारे राज्यात एकूण ११४ जागा आहेत ज्यातील ९० जागांवर निवडणुका होतील. मुख्य निवडणूक आयोग राजीव कुमार यांनी सांगितले की, राज्यात ८७ लाख ९ हजार मतदार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात एकूण ११ हजार ८३८ मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात येणार आहे.
हरियाणात २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत ९० पैकी सर्वाधिक ४० जागा भाजपने जिंकल्या होत्या. मात्र सरकार स्थापन करण्यासाठी ४६ जागांची गरज होती. काँग्रेसने ३१ तर जननायक जनता पार्टीने १० जागांवर विजय मिळवला होता. भाजपने JJP आणि अपक्ष उमेदवारांसह सरकार स्थापन केले होते. जेजेपीचे नेता दुष्यंत चौटाला हे उपमुख्यमंत्री झाले होते. यावेळी हरियातील सर्व जागांसाठी एका टप्प्यात मतदान होणार आहे. राज्यात १ ऑक्टोबर रोजी मतदान होईल आणि ४ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होतील.



