
रत्नागिरी : येथील नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या एस. पी. हेगशेट्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात महसूल पंधरवड्यानिमित्त युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात तहसीलदार राजाराम म्हात्रे, खेडशी मंडळ अधिकारी विजय राठोड, कुवारबावचे तलाठी, राजेश मुशिंगे, मिरजोळे गावच्या तलाठी श्रीमती वैभवी रहाटे, पानवलच्या तलाठी श्रीमती प्रिया नेवरेकर यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी माहिती देताना तहसीलदार श्री. म्हात्रे म्हणाले, महसूल विभागात जमीन महसूल, फेरफार अशी विविध कार्य केली जातात. जमा केलेला महसूल ग्रामपंचायतींमार्फत ग्रामस्थांना सेवा-सुविधा देण्यासाठी वापरला जातो. आधी कोतवाल मग तलाठी, मग मंडळ अधिकारी, त्यानंतर नायब तहसीलदार, तहसीलदार आणि नंतर जिल्हाधिकारी अशी महसूल विभागाची रचना असते. जगात २०६ देश आहेत. काही देशांत राजेशाही, तर काही देशांत हुकुमशाही चालते; मात्र भारत हा लोकशाहीवर आधारित देश असून, ग्रामपंचायतीपासून देशपातळीवर लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर निवडणूका घेऊन सरपंचांपासून पंतप्रधानांची निवड केली जाते.
आपल्या डोळ्यासमोर काहीतरी निश्चित उद्दीष्ट ठेवून त्यादृष्टीने अभ्यासाच्या पद्धती ठरवा. त्यासाठी वाचन कौशल्य, ऐकण्याचे कौशल्य विकसित करा. मोबाईलचा वापर मर्यादित करतानाच चित्त एकाग्र करा, असा मोलाचा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख प्रा. सुकुमार शिंदे, राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस) कार्यक्रम अधिकारी प्रा. सुशील साळवी, प्रा. सायली कांबळे, प्रा. प्रतीक्षा सुपल यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



