पीक स्पर्धेसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल करण्याचे आवाहन

रत्नागिरी : पीक उत्पादन तंत्रज्ञानाचा अवलंब करून पीक उत्पादकता वाढविण्यासाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले आहे.
विविध तंत्रज्ञानाचा वापर करून पिकाचे उत्पादन व उत्पादकता वाढवून शेतकऱ्यांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी राज्य शासनामार्फत विविध पिकांच्या पिकस्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. कृषी विद्यापीठामार्फत विकसित केलेले तंत्रज्ञान व शेतकऱ्यांच्या शेतावर उत्पादन यामध्ये दिसून येत असलेली तफावत दूर करून शेतकर्यांनी जास्तीत जास्त उत्पादन वाढवून उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहणे व त्यातून आपल्या उत्पादनामध्ये वाढ करून आर्थिक उन्नती साधणे आवश्यक आहे. हा उद्देश ठेवून अधिक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी भात व नाचणी हि प्रमुख खरीपाची पिके आहेत. या पिकांच्या स्पर्धा तालुका,जिल्हा,राज्य पातळीवर राबविण्यात येत असून अधिक उत्पन्न घेतलेल्या शेतकऱ्यांचे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढण्यात येतात.
पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी पात्रता निकष
पीक स्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीचे स्वत:च्या शेतावर त्या पिकाखाली भात पिकासाठी किमान २० आर क्षेत्रावर व इतर पिकासाठी ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. स्पर्धेत राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेल्या शेतकऱ्याला पुढील पाच वर्ष त्याच पिकासाठी स्पर्धेत सहभाग घेता येणार नाही. या स्पर्धेमध्ये राज्य ते तालुका स्तरावरील विजेत्या स्पर्धकास ज्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे त्या स्तरावरील त्या क्रमांकाच्या खालचा स्तर व क्रमांकासाठी स्पर्धकास त्याच पिकासाठी पुढील पाच वर्ष स्पर्धक म्हणून बक्षीसासाठी ग्राह्य धरले जाणार नाही. तथापि विजेता स्तरावरीलत्या क्रमांकाच्या वरील स्तर व क्रमांकासाठी स्पर्धक स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन बक्षीसाठी पात्र राहील.
अर्ज करण्यासठी आवश्यक कागदपत्रे पीक
स्पर्धेत भाग घेऊ इच्छीणाऱ्या स्पर्धकांनी खालील कागदपत्राची पूर्तता संबंधीत तालुका कृषि अधिकाऱ्याकडे करावयाची आहे. विहित नमुन्यातील अर्ज, .ठरवून दिल्लेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन पीकनिहाय (प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र) सर्वसाधारण गटासाठी रक्कम रुपये ३००/- व आदिवासी गटासाठी रक्कम रु.१५०/- राहील. ७/१२, ८ अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास), बँक खाते चेक/पासबुक पहिल्या पानाची छायांकीत प्रत,
अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख :
खरीप हंगाम भात व नाचणी – ३१ ऑगस्ट २०२४. पिक स्पर्धेत भाग घेतलेल्या स्पर्धेतून माघर घ्यावयाची झाल्यास कापणीपुर्वी १५ दिवस अगोदर माघार घेत असल्याचे तालुका कृषी अधिकारी कार्यलयास लेखी कळवावे . तसेच माघार कोणत्या कारणासाठी घेतली हे अर्जात सुस्पष्ट नमूद करावे. मात्र प्रवेश शुल्क परत केले जाणार नाही.
पीक स्पर्धा विजेते बक्षीसांचे स्वरूप व वितरण
तालुका पातळीवर पहिले बक्षीस ५ हजार रुपये, दुसरे ३ हजार रुपये, तिसरे २ हजार रुपये, जिल्हा पातळी पहिले बक्षीस १० हजार रुपये, दुसरे ७ हजार रुपये, तिसरे ५ हजार रुपये तर राज्य पातळीवर पहिले बक्षीस ५० हजार रुपये, दुसरे ४० हजार रुपये आणि तिसरे बक्षीस ३० हजार रुपये असणार आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक स्पर्धेस सहभागी व्हावे.



