“… आणि साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक आकार घेऊ लागले”

“साने गुरुजींचे पालगड (ता. दापोली, जि. रत्नागिरी) येथे नातेवाईकांच्या ताब्यात असलेले घर मिळवून तेथे साने गुरुजींचे स्मृतीभवन उभारावे हा विचार घेऊन १९९७ साली प्रकाश मोहाडीकर यांनी पहिली बैठक घेतली. त्यानंतर दुसऱ्या बैठकीत मी ५० एकर जागेत ५ कोटींचा प्रकल्प अहवाल तयार करून तो बैठकीत मांडला आणि त्याला मान्यता मिळाली. त्यानंतर ५० एकर ऐवजी ३६ एकर जागा मिळाली आणि वडघर (ता. माणगाव, जि. रायगड) येथे १९९९मध्ये निसर्गाच्या सान्निध्यात असलेले साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक आकार घेऊ लागले,” अशी आठवण साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या वाटचालीत विशेष योगदान देणाऱ्या गजानन खातू यांनी सांगितली.
वडघर (ता. माणगाव, जि. रायगड) येथे १९९९मध्ये साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक उभारले गेले. त्या स्मारकाला आता २५ वर्षे झाली आहेत. स्मारकाच्या वाटचालीत विशेष योगदान देणाऱ्या गजानन खातू, सुधीर देसाई, नीरजा, युवराज मोहिते व प्रमोद निगुडकर या पाच जणांशी राजा कांदळकर यांनी संवाद साधला आहे. सध्या साने गुरुजी यांचे १२५ वे जयंती वर्ष चालू आहे आणि ११ जून हा त्यांचा स्मृतिदिवस आहे. स्मारकाची जागा कशी मिळवली सांगताना सुधीर देसाई म्हणाले, “१९९७ पासून जागा पाहणीला सुरुवात केली. चिपळूणपासून ते पोलादपूरपर्यंत सलग १५ दिवस फिरल्यानंतर माणगाव येथील जागा पाहिली आणि ती सगळ्यांना पसंत पडली आणि तिथून स्मारकाच्या प्रवासाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. स्मारक बांधण्यासाठी छापलेल्या ५ रुपयांच्या देणगी पावत्यांच्यापासून कोकण, विदर्भ तसेच महाराष्ट्रातून कशाप्रकारे निधी जमवला याची सविस्तर माहिती देसाई यांनी दिली.
युवराज मोहिते यांनी मुलांच्या सहभागातून हे स्मारक उभे असल्याचे सांगितले. साने गुरुजींच्या विचारांचा, लेखनाचा संस्कार घेऊन ही बिनभिंतीची शाळा सुरू असल्याचे खातू यांनी नमूद केले.
सध्या साने गुरुजी यांचे १२५ वे जयंती वर्ष चालू आहे आणि ११ जून हा त्यांचा स्मृतिदिवस आहे. त्या निमित्ताने ‘ऐवज’ या मालिकेतील हा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करावे.



