जयगडमध्ये पहिली ‘भंडारी प्रीमियर लीग’ क्रिकेट स्पर्धा

रत्नागिरी : रत्नागिरीत प्रथमच ‘भंडारी प्रीमियर लीग’ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेचे उद्घाटन १६ मे रोजी रत्नागिरी तालुका भंडारी समाज अध्यक्ष राजीव कीर यांच्या हस्ते होणार आहे. ही स्पर्धा जयगड, कचरे येथील साईबाबा क्रीडांगणावर होईल. यात रत्नागिरी आणि गुहागर तालुक्यातील नामांकित १२ संघ सहभागी होणार आहेत.
ग्रामीण भागातील भंडारी समाज बांधवांच्या संकल्पनेतून या क्रिकेट स्पर्धा होणार आहे. यावेळी नांदिवडेच्या सरपंच आर्या गडदे, मालगुंडच्या सरपंच श्वेता खेऊर, वरवडेचे सरपंच विराग पारकर, कासारवेलीच्या सरपंच वेदिका बोरकर, काळबादेवीच्या सरपंच तृप्ती पाटील, गुहागर तालुक्यातील भंडारी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते निलेश सुर्वे आदी उपस्थित राहणार आहेत.
पहिल्यांदाच भरवण्यात येणाऱ्या भंडारी प्रीमियर लीगसाठी लाखोंची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेत विजेत्या संघाला ५१ हजार रोख व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. उपविजेत्या संघाला ३५ हजार रोख व चषक, तृतीय क्रमांकाचे पारितोषिक २५ हजार रोख व चषक, चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक ११ हजार रोख व चषक देऊन गौरवण्यात येणार आहे. याशिवाय मालिकावीर, उत्कृष्ठ फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, सर्वाधिक षटकार, सर्वाधिक चौकार मारणाऱ्या खेळाडूला देखील गौरवण्यात येणार आहे.
या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी निखिल बोरकर ९४२२७५०९०७ आणि पंकज नार्वेकर ८६६८६९९८४४ या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.



