कोकण हे ठाकरे कुटुंबीयांचे हृदय : उद्धव ठाकरे

रत्नागिरी : “कोकण हे ठाकरे कुटुंबीयांचे हृदय आहे त्यामुळे मला येथे प्रचार करायची गरज वाटत नाही. शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला, तरीही तुम्ही मात्र जागच्या जागी उभे राहिलात याचा मला अभिमान वाटतो. वर्षानुवर्ष जीवापाड जपलेले धनुष्यबाण चोरले मात्र आता ते सुद्धा कोकणातून सुद्धा गायब करून टाकले,” अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे केली.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी शहरातील शासकीय जलतरण तलावा शेजारील मैदानावर ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार विनायक राऊत, आमदार राजन साळवी आमदार भास्कर जाधव, आमदार वैभव नाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचेचे कुमार शेट्ये, माजी शहराध्यक्ष प्रमोद शेरे, प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांच्यासह महाआघाडीचे सर्व प्रमुख नेते आणि पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. या वेळी सौ. रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे ही उपस्थित होते.
मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना श्री. ठाकरे म्हणाले “भारताचे राजकारण हे आयपीएलसारखे झाले आहे, जसा आज या संघात असलेला खेळाडू दुसऱ्या संघात जातो तसाच आज या पक्षात असलेला नेता आमदार दुसऱ्या दिवशी दुसऱ्याच पक्षात गेलेला दिसतो. मोदींचा अजूनही सूर लागत नाहीये. २०१४ आणि २०१९ सालचा आत्मविश्वास आता दिसत नाही. त्यावेळी शिवसेना सोबत होती म्हणून रुबाब होता, छाती ५६ इंचाची होती, मात्र आता हवा गेली आहे. त्यावेळी नारा दिला होता ‘एक अकेला सबपे भारी’ आता ‘एक अकेला सबपे भारी, आजूबाजूला सर्व भ्रष्टाचारी’ अशी गत भाजपची झाली आहे. भाजपची ही दुर्दशा बघून कोणाच्या हाती भाजप गेला म्हणून अटलजींचा आत्माही रडत असेल. युती तुटायच्या आधी हे महाराष्ट्रात किती वेळा यायचे, कारण अख्खी शिवसेना पाठीशी असताना तिकडे फिरवण्याची गरजच वाटली नाही पण आता वारंवार फेऱ्या घालतात विनाशकाले विपरीत बुद्धी अशी एक म्हण आहे त्याचाच प्रत्यय येता येतोय यांचा विनाश जवळ आलाय यांचा विनाश होतोय तुम्ही बाजूला व्हा असा संकेत नियतीने आम्हाला दिला आणि आम्ही बाजूला झालो संपूर्ण यंत्रणा वापरून यांनी शिवसेना चोरली, धनुष्यबाण चोरले आणि आता गद्दारांना अंगावर सोडून शिवसेना संपवायला निघालेत. ही कर्तृत्वशून्य माणसं असून, यांच्या अंगात स्वतःचे कर्तृत्व नाही. यांना शिवसेनेची घराणेशाही नको आहे. पण गद्दारांची भ्रष्टाचारांची घराणेशाही चालते, याचे दुःख यांना नाही पण अटलजींना मात्र नक्कीच वाटत असेल.”
कोकणात गुंडाराज पाहिजे का असा प्रश्न विचारताना श्री. ठाकरे म्हणाले, “मिंधेंच्या हातात सत्ता आहे तोपर्यंत असेच गुंडांचेच राज्य राहील, शिवसेना मध्ये उभी राहिली नसती तर बारसूचा विषय ही त्यांनी केव्हाच संपवला असता. महाआघाडीची सत्ता आली तर कोकणात विनाशकारी प्रकल्प आणू देणार नाही. कोणाला मत द्यायचे याचा विचार आता तुम्हीच करा. कोणाचा प्रचार करताय तुम्ही, मोदीना मत म्हणजे विनाशाला मत. एकीकडे विनाश आहे, तर दुसरीकडे विघ्नविनाशक विनायक आहे. त्यामुळे विचार करा आणि मतदान करा. ईडी मागे लावून आमच्या आमदारांना अडचणीत आणले. बाळासाहेबांच्या खुर्चीची किंमत केली, “४०० पार”ची घोषणा कशासाठी, तर घटना बदलण्यासाठी. घटना बदलण्याची अवदसा का आठवली यांना? कारण ही घटना महाराष्ट्राच्या सुपुत्राने म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिली आहे. डॉक्टर आंबेडकर हे महाराष्ट्राचे दैवत आहेत. म्हणूनच यांना ती घटना बदलायची आहे. त्यांना महाराष्ट्राचा आकस आहे.”
महाराष्ट्राचे उद्योग धंदे गुजरातला 2014 स*** 15 लाख जनतेच्या खात्यात जमा होतील असा असे आश्वासन देण्यात आले होते आजपर्यंत किती जणांच्या खात्यात मोदी सरकारकडून १५ लाख जमा झाले: मात्र भाजपच्या खात्यात निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून हजारो कोटी मात्र जमा झाले. काँग्रेसला ६० वर्षात जे जमले नाही त्यांनी अडीच वर्षात कमावले दहा हजार कोटींचे रोखे आणखी लुबाडणार होते. भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पुन्हा रोख्यांचा नवीन कायदा आणणार असे सांगितले; मात्र त्यांच्याच पतीने हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचे सांगितले. आम्ही कोणावरही आरोप करत नसून आम्ही सत्य तेच सांगतोय. अबकी बार ४०० पार नाही, तर अबकी बार तडीपार, हीच शिक्षा आता जनता यांना देणार आहे.”



