नारायण राणेंनी घेतले उमेदवारी अर्ज; किरण सामंतही घेणार

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघांतून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वतीने कार्यकर्त्यांनी दोन दिवसांपूर्वी उमेदवारीचे ४ अर्ज विकत घेतले होते. आता किरण सामंतही आज रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातून उमेदवारी अर्ज विकत घेणार असल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे. त्यातच नारायण राणे १९ एप्रिलला महायुतीकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघांत महायुतीच्या उमेदवाराच्या जागेचा तिढा काही केल्या सुटत नसून गेले काही दिवस केवळ पक्ष वरिष्ठांशी चर्चेच्या फैरी झडत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि किरण सामंत हे दोघेही या जागेसाठी आग्रही असून दोघांनीही आपापल्या परीने प्रचाराला सुरुवात केली आहे. अजून कोणताच निर्णय होत नसल्याने किरण सामंत यांनी काल (ता. १५) तातडीने नागपूरकडे प्रयाण करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती, तसेच पक्षाचा जो आदेश असेल तो मान्य असेल, असे झालेल्या चर्चेत सांगितले होते.
मात्र आज नारायण राणे आणि किरण सामंत हे दोघेही उमेदवारी अर्ज खरेदी करत असल्याने नेमकी काय समीकरणे जुळणार आहेत की बिघडणार आहेत याची मांडणी करत असतानाच हा सामना भाजप विरुद्ध शिंदे शिवसेना असा तर रंगणार नाही ना याबद्दलही उलटसुलट चर्चा सुरू आहे. दरम्यान, २२ एप्रिलला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असून, जर नारायण राणे आणि किरण सामंत या दोघांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला तर शेवटच्या दिवशी कोण पक्षाचा आदेश मानत आपला अर्ज मागे घेणार आणि कोण पक्षाचा आदेश धुडकावून लावणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.



