मुख्य बातमीराजकीय

मानवी साखळीद्वारे विद्यार्थ्यांकडून पालकांना मतदान करण्याचे आवाहन

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपालिका शाळा क्रमांक १५ दामले विद्यालय आणि जिल्हा प्रशासन यांच्या वतीने मतदान जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची कलाकृती आणि साखळी निर्माण करण्यात आली. पालकांनी मतदान करून आपली जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन करणाऱ्या संकल्प पत्राचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.
आज (ता. २) झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी म्हणाले, ‘येत्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध माध्यमातून जनजागृती केली जात आहे. मानवी साखळीतून, कलाकृतीतून मतदान करण्याचा संदेश देण्यात येत आहे. पालकांनी मतदान करावे, यासाठी विद्यार्थ्यांमार्फत त्यांना आवाहन केले जात आहे. विद्यार्थ्यांना संकल्पपत्राचे वाटप करण्यात आले असून, हे संकल्प पत्र पालकांनी भरून द्यावे. मतदार जनजागृतीअंतर्गत सायकल रॅली, मॅरेथॉन याबरोबरच बोट रॅलीचेही आयोजन केले आहे.’
विद्यार्थ्यांना वाटप केलेल्या संकल्पपत्रामध्ये पुढील मजकूर देण्यात आला आहे, ”मी शपथ घेतो, मी भारतीय घटनेने मला मतदान करण्याचा जो अमूल्य अधिकार दिला आहे, त्या अधिकाराचा कोणत्याही परिस्थितीत वापर करेन. मतदान करून आपला उमेदवार निवडण्याचा माझा फक्त अधिकार नसून, ती माझी राष्ट्रीय जबाबदारी आहे. मी अशीही शपथ घेतो, देशहिताकरिता जनतेच्या इच्छा, आकांक्षा पूर्ण करू शकणाऱ्या सर्वोत्तम उमेदवाराची निवड करण्यासाठी, मी माझ्या कुटुंबातील सदस्यांना तसेच माझ्या परिचित व्यक्तींना मतदान करण्यासाठी प्रेरित व प्रोत्साहित करेन. मी अशीही शपथ घेतो, मी धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली किंवा कोणत्याही प्रलोभास बळी न पडता मतदान करण्याची जबाबदारी मी पार पाडेन.”
आजच्या या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे, मुख्याधिकारी तुषार बाबर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विरेंद्र माईन, मुख्याध्यापिका नीलम जाधव यांच्यासह सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
फलक माध्यमातून मतदान जनजागृत्ती
जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून विशेषत: उपविभागीय अधिकारी, तहसील कार्यालय, नगरपालिका, जिल्हा परिषद यंत्रणा यांच्या वतीने विविध विधानसभा मतदारसंघात फ्लेक्स, सेल्फी पॉईंट यांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. ‘मत आपले द्यायचे, कर्तव्य आपले बजावायचे’, ‘मतदान अधिकार पण, कर्तव्य पण’, ‘मतदान मतदात्याची शान’, ‘मतदानाचे कर्तव्य बजावून महाराष्ट्राला एक उत्तम राज्य बनवू या’, असे संदेश देणारे फलक प्रदर्शित केले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button