
रत्नागिरी येथे जिल्हा महिला व बालविकास विभागातर्फे दिनांक 18 जानेवारी ते 20 जानेवारी 2023 या कालावधीत आयोजित चाचा नेहरू जिल्हास्तरीय बाल महोत्सव नुकताच पार पडला. या बाल महोत्सवांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व बालगृह, निरीक्षण गृह व नगरपरिषद शाळांचा समावेश होता. दोन दिवसीय कार्यक्रमांमध्ये क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या उद्घघाटनप्रसंगी मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.आर. जोशी, अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश भिले, प्रधान न्याय दंडाधिकारी माणिकराव सातव, मातृमंदिर संस्थेचे कार्याध्यक्ष अभिजित हेगशेटये, बाल न्याय मंडळाच्या सदस्या विनया घाग, इंदुमती मलुष्टे, जिल्हा बाल कल्याण समितीचे अध्यक्ष संदेश शहाणे व सदस्य, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर. बी. काटकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी समृध्दी वीर तसेच सर्व संस्थांचे अधिक्षक व कर्मचारी आणि नगर परिषद शाळांचे शिक्षक उपस्थित होते.
गोकुळ बालगृहातील सर्व प्रवेशितांनी सर्व स्पर्धांमध्ये आपला सहभाग नोंदवला होता. कोरोना महामारीनंतर आयोजित केलेल्या बाल महोत्सवात सर्व विद्यार्थी तसेच प्रवेशित बालके अत्यंत तयारीने व उत्साहाने सहभागी झाले होते. सदर बालमहोत्सवांमधील सर्व क्रीडा स्पर्धा छ. शिवाजी महाराज स्टेडियम रत्नागिरी येथे पार पडल्या.
या स्पर्धांमध्ये मातृमंदिर गोकुळ च्या मुलींनी सर्व प्रकारात सहभाग घेत उत्कृष्ठ कामगिरी केली. गोकुळ मुलींना मिळेलली पदके…
🔹क्रिकेट स्पर्धा (मुली) विजेता संघ म्हणून गोकुळ बालगृहास पारितोषिक मिळाले.
🔹 बुद्धिबळ लहान गट उपविजेता- रिया बोबले,
🔹गोळा फेक मोठा गट – समृध्दी पुरी, गोळा फेक लहान गट- रिया बोबले,
🔹चित्रकला मोठा गट- उपासना उंडे, चित्रकला लहान गट- जिज्ञासा पाले,
🔹हस्ताक्षर मोठा गट- ऐश्वर्या गुरव इत्यादींना पारितोषिके मिळाली.
बालमहोत्सवात सांस्कतिक स्पर्धा देखील घेण्यात आल्या त्यामध्ये गोकुळ बालगृहातील बालकांनी सादर केलेल्या कार्यक्रमात सामाजिक विषयांवर आधारित
🔹पथनाट्य सादरीकरण- प्रथम क्रमांक
🔹सामूहिक नृत्य- प्रथम क्रमांक
🔹वैयक्तिक नृत्य (मोठा गट)- द्वितीय क्रमांक,
🔹सामूहिक नृत्य (लहान गट)- व्दितीय क्रमांक
इत्यादी पारितोषिके पटकावली.
दिनांक 20 जानेवारी रोजी बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी सर्व विजेते व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक बक्षीस वितरण कार्यक्रमाकरीता उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
शाळांमधून सहभागी झालेले विद्यार्थी व संस्थांमधील विद्यार्थी यांमध्ये कोणतेही अंतर न दिसता सर्व बालके एका पातळीवर सहभागी होताना दिसली याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आई वडील असणाऱ्यांना जसा आई वडिलांचा आधार आहे तसा हा आधार नसणाऱ्या बालकांना प्रत्येक वेळी संस्थाच सगळा आधार बनून त्यांना प्रोत्साहन देत असते. याची प्रचिती या बाल महोत्सवात बालकांनी नोंदवलेल्या सहभागातून व त्यांनी मिळवलेल्या यशातून येते.



