मांडकी पालवण येथे १४ व १५ फेब्रुवारीला कृषी व सहकार साहित्य संमेलन

रत्नागिरी :- कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था मांडकी पालवण, तालुका चिपळूण या शिक्षण संस्थेच्या वतीने दिनांक 14 व 15 फेब्रुवारी रोजी ग्रामीण कृषी व सहकार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले.
यासंदर्भात आज रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या हॉलमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, या पत्रकार परिषदेला संमेलन संयोजन समितीचे अध्यक्ष प्रकाश देशपांडे, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव, संचालक दीपक पटवर्धन, जयवंत जालगावकर, गजानन पाटील, मंदार सप्रे, सौ. नेहा माने, राजेंद्र सुर्वे, आबा टिळेकर यांच्यासह अरुण इंगवले, संदीप राजपुरे, कोषाध्यक्ष अजय चव्हाण, धीरज वाटेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सहकार हा कृषीचा अविभाज्य घटक आहे. विना सहकार नाही उद्धार असे म्हणतात. सहकाराची लोकांना माहिती देण्यासाठी व चांगला सहकार रुजवण्यासाठी अनेक सहकार क्षेत्रातील नामवंत लेखकांनी सहकार साहित्य निर्माण केले आहे. त्याचा फायदा सहकारी बँका, नागरी पतसंस्था, गृहनिर्माण संस्था, विविध कार्यकारी सहकारी संस्था, दुग्ध सहकारी संस्था, साखर कारखाने व इतर सहकारी संस्था चालविणे व वाढवण्यासाठी होतो.
या सर्वांचा फायदा शेतकरी व सामान्य नागरिकांना महाराष्ट्रात होत आहे या तीनही क्षेत्रातील नामवंत लेखकांनी निर्माण केलेले साहित्य जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचावे, लेखक व साहित्याची ओळख सामान्यतील सामान्य माणसाला व्हावी या हेतूने या कृषी व सहकार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ साहित्यिक कृषी भूषण तानाजीराव चोरगे यांच्याकडे संमेलन अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे तसेच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्याकडे स्वागताध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
या संमेलनाचे उद्घाटन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्र पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत आदी मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे. त्याचप्रमाणे समारोप कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.



