दशावताराचा असाही परिणाम, कोकणच्या खऱ्या ‘राखणदाराचे’ सौंदर्य जपणार आता सरकार!

रत्नागिरी – महाराष्ट्रात सध्या दशावतार हा सिनेमा प्रचंड गाजतोय. कोकणची संस्कृती, राखणदार आणि कातळशिल्प याभोवती फिरणाऱ्या या सिनेमाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे.
तर, या सिनेमानंतर अनेकांना कातळशिल्पाबाबत उत्सुकता वाटू लागली आहे. कोकणातील अश्मयुगीन कातळशिल्पांबाबत महाराष्ट्रा शासनाच्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
अश्मयुगीन काळातील ही कातळशिल्प म्हणजे जणू गूढच आहेत. इतिहासितील मानवी संस्कृतीच्या पाऊलखुणा असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीत. या कातळशिल्पांना संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. रत्नागिरी ते गोवा जवळपास 900 किमी क्षेत्रावर हे कातळशिल्प पसरलेले आहे. एकट्या रत्नागिरीतच 70 ठिकाणी 1,500 हून अधिक अशी कातळशिल्प आढळली आहे. त्यामुळं या कातळशिल्पाबाबत अनेकांना आश्चर्य आहे.
जागतिक पर्यटन दिनानिमित्त कोकणातील अश्मयुगीन कातळशिल्प जतन संवर्धन तसेच प्रचार, प्रसार आणि प्रसिद्धीसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आणि निसर्गयात्री संस्था, रत्नागिरी यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. ‘युनेस्को’ जागतिक वारसा स्थळ दर्जा मिळण्याच्या प्रक्रियेत समाविष्ट असलेली कोकणातील अश्मयुगीन कातळशिल्प आकर्षणकेंद्र आहेत.
पर्यटकांसाठी ही कातळशिल्पे भवितव्यात कोकण पर्यटन क्षेत्रात आणि त्याअनुषंगाने सर्वांगीण विकासात महत्वपूर्ण भूमिका निभावणार आहेत, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश गटने यांनी रत्नागिरीस्थित कातळशिल्प आणि वारसा संशोधन केंद्राला भेट दिली. तसेच त्यांच्या प्रमुख उपस्थितीत गणपतीपुळे येथे आयोजित कार्यक्रमात निसर्गयात्री संस्था, रत्नागिरीचे संस्थापक अध्यक्ष तसेच कोकणातील कातळशिल्प शोधकर्ते व अभ्यासक सुधीर रिसबूड आणि प्रादेशिक व्यवस्थापक एमटीडीसीचे दीपक माने यांच्या स्वाक्षरीने, हा सामंजस्य करार करण्यात आला आहे.



