पर्यटनमुख्य बातमी

नापणे, वैभववाडी, धबधब्यावर उभारला राज्यातील पहिला काचेचा पुल

वैभववाडी : नापणे धबधब्यावर राज्यातील पहिला काचेचा पूल उभारण्यात आला आहे. या पुलामुळे निश्चित सिंधुदुर्गच्या पर्यटनाला चालना मिळेल. आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून नापणे धबधबा नावारुपाला येईल. पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी धबधब्यावरील काचेच्या पुलाचा आनंद लुटावा पण स्वतःची काळजी घ्यावी, शासनाच्या नियमांचे पालन करा असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी उद्घाटन  प्रसंगी केले.

बारमाही वाहणाऱ्या नापणे धबधब्यावरती सिंधूरत्न योजनेतून उभारण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी पत्रकारांशी बोलताना नितेश राणे म्हणाले, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस. मुख्यमंत्री हे विकास पुरुष आहेत. विकास आणि देवेंद्र फडणवीस हे वेगळं समीकरण आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून या पुलाचं उद्घाटन होत आहे, याचा निश्चित आम्हा सर्वांना आनंद आहे. धबधब्यावरील उर्वरित सोयीसुविधा या नापणे, शेर्पे व नाधवडे गावचे प्रमुख पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल. या ठिकाणी पार्किंग व्यवस्था, हॉटेल, दिशादर्शक फलक या सर्व सुविधा टप्प्याटप्प्याने पुर्ण होतील. सद्यस्थितीत आज सुरक्षा महत्त्वाची आहे. त्या दृष्टीनेच हा पूल उभारण्यात आल्याचे नितेश राणे यांनी सांगितले.

उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, वैभववाडी मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे,व पदाधिकारी, ग्रामस्थ, पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्घाटनानंतर नितेश राणे यांनी पुलावरून फेरफटका मारत पाहणी केली.

सिंधुरत्न समृध्दी योजनेतून हा पुल उभारण्यात आला आहे. त्यामुळे नितेश राणे यांनी सिंधू रत्नचे अध्यक्ष, माजी मंत्री दीपक केसरकर यांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button