‘कोमसाप’तर्फे कथाकथनाचे आयोजन

रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या (कोमसाप) युवा शाखेतर्फे ११ मार्चला रा. भा. शिर्के प्रशालेतील रंजन मंदिर सभागृहात कथाकथनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या प्रसंगी लेखिका-पत्रकार मेघा कोल्हटकर यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोबाईलच्या विश्वात रममाण असणाऱ्या मुलांना तो वेळ वाचनासाठी द्यावा, वाचनातून त्यांना नवनवीन क्षेत्रांची ओळख व्हावी आणि त्याचा उपयोग त्यांना भविष्यात व्हावा याहेतूने हा कार्यक्रम घेण्यात आला. हा कार्यक्रम म्हणजे कथाकथनाचे दुसरे पुष्प आहे. प्रशालेच्या पर्यवेक्षिका पूनम पवार यांनी कथाकथन हा विषय मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांमध्ये सर्व वर्गांना अभ्यासक्रमांत असल्याची माहिती दिली. व्यक्तिमत्वांतील चौकसपणा किती महत्त्वाचा आहे हे ज्ञानेश्वर पाटील यांनी ‘पाऊल तिचं’ तर दुर्गेश आखाडे यांनी ‘अपहरण’ या कथांमधून विद्यार्थ्यांना सांगितले.
जेष्ठ साहित्यिक डॉ. दिलीप पाखरे व ‘कोमसाप’चे जिल्हा सचिव राजेश गोसावी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ‘कथा’ हा वाङ्मयप्रकार असा आहे, वाचन-लेखनाची आवड निर्माण झाली की, निरीक्षणशक्ती वाढते. सभोवताली वावरणाऱ्या तसेच काही स्मरणीय व्यक्तिमत्वांतील विविधता सहज टिपता येते. वाचनातून अनेक क्षेत्रांतील उत्तुंग कार्यकर्तृत्व समोर येते, उत्तम वाचकांसाठी हे विश्व रमणीय असते जे कायम सोबत असते. बोलीभाषांचा परिचय, सौंदर्य वेगळेच, लेखक-लेखिका ज्या परिसरांतील रहिवाशी असतात त्या भाषेचा ठसा त्यांच्या लेखनातून उमटतो. विशेषतः उन्हाळ्याच्या मोठ्या सुट्टीमध्ये विद्यार्थीवर्ग इतर अनेक खेळांसमवेत वाचनास वेळ देऊ शकतो. भविष्यांसाठी एखाद्या क्षेत्राची निवड करायची असेल, तर त्याचे काम कसे असते किंवा चालते याची माहिती देणारी पुस्तके आज बाजारपेठेत उपलब्ध असून, या सगळ्यांची ओळख करून घेणे म्हणजे एक प्रकारची पर्वणीच असल्याचे मान्यवरांनी या प्रसंगी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश मोहिते यांनी केले.



