रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर

मुंबई– भारतीय संघाचा कर्णधार आणि अनुभवी फलंदाज रोहित शर्माने टी 20 नंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. रोहितने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. रोहितने एकाएकी घेतलेल्या या निर्णयामुळे क्रिकेट चाहत्यांना मोठा झटका बसला आहे.
रोहित शर्माने इंस्टा स्टोरीत त्याच्या २८० क्रमांकाच्या टोपीचा फोटो पोस्ट केला आहे. मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. भारतीय संघाचं कसोटी क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणं ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. मी तुमच्या प्रेमासाठी आणि पाठींब्यासाठी आभारी आहे”, असं रोहितने या इंस्टा स्टोरीत नमूद केलं आहे.
रोहित गेल्या दोन सामन्यांत चांगली फलंदाजी करू शकला नव्हता. त्याचबरोबर तो हा फक्त इम्पॅक्ट प्लेअर म्हणूनच खेळत होता. पण आता त्याने यापुढे कसोटी क्रिकेट खेळणार नसल्याचे रोहित शर्माने आता स्पष्ट केले आहे. यापूर्वी रोहितने टी २० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, त्यानंतर आता तो कसोटी क्रिकेटमध्येही खेळणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. सध्याा आयपीएल सुरु आहे. पण आयपीएलनंतर भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार होता. त्यासाठी रोहित शर्माची निवड होणार की नाही, याची चर्चा सुरु होती. पण निवड समितीने संघ निवडण्यापूर्वीच आपण कसोटी क्रिकेट खेळणार नसल्याचे आता रोहित शर्माने स्पष्ट केले आहे.
कसोटी कारकीर्द
रोहित शर्मा याने ६ नोव्हेंबर २०१३ रोजी कोलकातामधील इडन गार्डन्समध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी पदार्पण केलं होतं. रोहितने तेव्हापासून गेली १२ कसोटी संघांचं प्रतिनिधित्व केलं. तसेच रोहितने या दरम्यान काही वर्ष भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली. रोहितने ६७ कसोटी सामन्यांमधील ११६ डावांमध्ये ५७.०८ या स्ट्राईक रेटने आणि ४०.५८ च्या सरासरीने ४ हजार ३०२ धावा केल्या आहेत. रोहितने या दरम्यान ८८ षटकार आणि ४७३ चौकार लगावले. रोहितने १२ वर्षांच्या कसोटी कारकीर्दीत १८ अर्धशतकं, १२ शतकं आणि एक द्विशतक झळकावलं होतं. रोहितची २१२ ही कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या होती.
रोहितने २०२२ – २०२४ दरम्यान एकूण २४ सामन्यांमध्ये भारतीय कसोटी संघाचं नेतृत्व केलं. रोहितने टीम इंडियाला आपल्या नेतृत्वात २४ पैकी १२ सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला. तर ९ वेळा पराभवाचा सामना करावा लागला. तर ३ सामने अनिर्णित राहिले. रोहितची कर्णधार म्हणून ५७.१४ अशी विजयी टक्केवारी राहिली.
रोहितने भारतीय संघाला त्याच्या नेतृत्वात २०२१ – २०२३ या वर्ल्ड टेस्ट चॅम्पनशीप स्पर्धेचं उपविजेतेपद मिळवून दिलं होतं. भारताला या डब्ल्यूटीसी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने पराभूत केलं. त्यामुळे भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं.
रोहित शर्मा बऱ्याच दिवसांपासून खराब फॉर्मशी झुंजत होता. त्याने १५ कसोटी सामन्यांमध्ये १०.८३ च्या सरासरीने १६४ धावा केल्या. बांगलादेश आणि न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मालिकेतही त्याने निराशाजनक कामगिरी केली. मुलाच्या जन्मामुळे तो बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात खेळला नाही. अॅडलेडमधील दुसऱ्या कसोटी सामन्यात रोहित परतला. पण त्याने डावाची सुरुवात केली नाही. या सामन्यात यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुलने डावाची सुरुवात केली. रोहित सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. पण तो स्वस्तात माघारी परतला. ब्रिस्बेनमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीत त्याने फक्त १० धावा केल्या. त्यानंतर रोहित वरच्या फळीत परतला, पण तिथेही तो अपयशी ठरला. मेलबर्न कसोटीत तो नऊ धावांवर बाद झाला.



