काँग्रेस पक्षाची राज्यात संविधान बचाव व सद्भावना यात्रा

मुंबई :अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार राज्यात संविधान बचाव यात्रा तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आयोजित सद्भावना यात्रा काढण्यात येणार आहेत. २९ एप्रिलला नाशिक येथे सद्भावना यात्रेचे आयोजन केले असून १ मे रोजी सद्भावना सत्याग्रह तर ४ आणि ५ मे रोजी परभणी येथे सद्भावना यात्रा तथा संविधान बचाव यात्रेचे आयोजन केले आहे, अशी माहिती प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.
टिळक भवन दादर येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, CWC सदस्य नसीम खान, खा. तारिक अन्वर, अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव कुणाल चौधरी, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, आ. विकास ठाकरे, आ. अभिजित वंजारी, आ. प्रज्ञा सावत, एनएसयुआयचे आमिर शेख, प्रदेश उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील यांच्यासह प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने २०२५ हे वर्ष संघटन वर्ष घोषीत केली आहे, त्याअनुषंगाने संघटना मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. पक्षाची पदे असणाऱ्यांना पक्षासाठी वेळ द्यावा लागेल. जिल्हाध्यक्षांनी महिन्यातून किमान १० पूर्ण दिवस वेगवेगळ्या ब्लॉकमध्ये फिरावे, पक्षाने दिलेल्या आंदोलनात्मक कार्यक्रमांची अंमलबजावणी करावी, महिन्यातून किमान १ बैठक घेतली पाहिजे. तर ब्लॉक अध्यक्षांनी महिन्यातून किमान ८ पूर्ण दिवस प्रभागांमध्ये फिरावे. जिल्हा काँग्रेसच्या आंदोलनात सहभागी व्हावे. महिन्यातून किमान १ बैठक घ्यावी, प्रदेश पदाधिकाऱ्यांनी नेमून दिलेल्या जिल्ह्यात महिन्यातून किमान ६ पूर्ण दिवस दौरे करावे, दोन दिवस प्रदेश कार्यालयाने दिलेली जबाबदारी पूर्ण करावी, महिन्याच्या १० तारखेला प्रदेश कार्यालयाला अहवाल सादर करावा.
बैठकीत राजकीय ठराव मांडण्यात आले त्याची माहिती विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली, ते म्हणाले की, राज्यात हिंदी भाषेची सक्ती करण्यास सर्व स्तरातून विरोध होत असल्याने सरकार बॅकफूटवर गेले आहे. राज्य सरकारने भाषा समितीशी सुद्धा चर्चा केली नाही त्यामुळे या समितीनेही हिंदी भाषा सक्तीला विरोध केला, त्याचे स्वागत करण्यात आले. राज्यात हिंदी भाषेची सक्ती करु नये असा ठराव या बैठकीत करण्यात आला. राज्यात , देशातील सामाजिक शांतता बिघडवण्याचे काम सत्ताधारी पक्षाशी संबंधित काही लोक करत आहेत. रामदेव बाबानी ‘सरबत जिहाद’ आणला त्याच्या निषेधाचा ठरावही करण्यात आल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली.



