जिजाऊंनी शिवरायांना प्रेरणा, प्रोत्साहन, स्वातंत्र्याचा विचार दिला : अमित शहा

रायगड :- छत्रपती शिवाजी महाराज यांची आज ३४५ वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त मी ऐतिहासिक रायगडावर प्रेरणा घेण्यासाठी आलो आहे. शिवरायांना महाराष्ट्रपुरते मर्यादित ठेऊ नका. तर त्यांचा विचार हिंदुस्थानात पोहोचविणे गरजेचे आहे. राजमाता जिजाऊंना माझा प्रणाम. त्यांनी शिवरायांना केवळ जन्म दिला नाही, तर स्वराज्य निर्मितीसाठी प्रेरणा, प्रोत्साहन आणि स्वातंत्र्यांचा विचार दिला. त्यामुळेच शिवरायांनी महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्यात रूपांतर करून स्वराज्याचे स्वप्न साकार केले, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले.
छत्रपती शिवरायांच्या ३४५ व्या पुण्यतिथीनिमित्त रायगडावर कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, मंत्री आशिष शेलार, खासदार उदयनराजे भोसले आदी उपस्थित होते.
शहा पुढे म्हणाले की, मी शिवचरित्र वाचले आहे. शिवरायांनी आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाहीशी लढा दिला. दक्षिणेतील कन्याकुमारी पर्यंत धडक दिली. स्वतःला आलमगिरी म्हणवून घेणाऱ्याला येथे पराभूत व्हावे लागले.



