महाराष्ट्र राज्यमुख्य बातमी

आदित्य ठाकरेंचा ड्रग्सच्या व्यापारात हात ; वकील नीलेश ओझा यांचा दावा         

आदित्य ठाकरेंचा ड्रग्सच्या व्यापारात हात; वकील नीलेश ओझा यांचा दावा       

मुंबई :  दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबईच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांची भेट घेऊन आपल्या मुलीच्या हत्येची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. या प्रकरणी उद्धव ठाकरे यांनाही सहआरोपी केले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांना वाचवण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केला, असा आरोप त्यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांचा ड्रुग्सच्या व्यापारात हात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

दिशा सालियनचा 8 जून 2020 रोजी संशयास्पद मृत्यू झाला होता. वडील सतीश सालियन यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आपल्या मुलीची सामूहिक अत्याचारानंतर हत्या करण्यात आल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी त्यांनी मंगळवार, २५ मार्च या दिवशी मुंबईच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांची भेट घेऊन लेखी तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांशी बोलताना त्यांच्या वकिलांनी या प्रकरणात उद्धव ठाकरे यांनाही सहआरोपी करण्यात आल्याचे सांगितले.

सतीश सालियन यांचे वकील नीलेश ओझा म्हणाले की, आम्ही आमची तक्रार मुंबईच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांकडे (गुन्हे) दिली आहे. त्यांनी सीपींशी चर्चा करून आमची तक्रार दाखल करून घेतली आहे. आता आरोपींना केव्हा अटक करणार? याची जबाबदारी पोलिसांवर आहे. आरोपींमध्ये आदित्य ठाकरे, डिनो मोरिया, सुरज पंचोली, त्यांचे अंगरक्षक, परमबीर सिंह, सचिन वाझे, रिया चक्रवर्ती यांचा समावेश आहे.

आदित्य ठाकरे यांचा ड्रग्जच्या व्यापारात सहभाग असल्याबाबत माहिती आम्ही यात दिली आहे. आदित्य ठाकरे व डिनो मोरिया यांच्या फोनवरील रेकॉर्डिंगचाही यात समावेश आहेत. या सर्वांचा नार्कोटिक्स ब्युरोने ड्रग्ज प्रकरणात आरोपी बनवलेल्या समीर खानशी संबंध आहे. त्यावर सरकारने उत्तर द्यावे. आदित्य ठाकरे यांचा ड्रग्ज प्रकरणात समावेश असताना त्यांना अटक करण्यापासून कुणी रोखले व त्यात किती कोटींची डील झाली होती हे त्यांनी सांगावे, असे नीलेश ओझा म्हणाले. दिशा सालियनचा मित्र स्टिव्ह पिंटो अद्याप बेपत्ता असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.

पत्रकारांनी यावेळी नीलेश ओझा यांना या प्रकरणात तुम्ही ‘उद्धव ठाकरे यांना आरोपी केले काय ?’, असा प्रश्न केला. त्यावर त्यांनी ‘हो’ असे सकारात्मक उत्तर दिले. ते म्हणाले, या प्रकरणात उद्धव ठाकरेही आरोपी आहेत. तेव्हा ते मुख्यमंत्री होते. त्यांनी आदित्य ठाकरे यांनी केलेला गुन्हा लपवण्यासाठी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीचा गैरवापर केला. सचिन वाझे हे त्यांच्याच गँगचे सदस्य होते. उच्च न्यायालयाने ख्वाजा युनूस हत्या प्रकरणात सचिन वाझे यांना तुरुंगात पाठवले होते. ते १६ वर्षे निलंबित होते. उद्धव ठाकरे यांनी आपल्या काळात त्यांचे निलंबन मागे घेऊन त्यांना पुन्हा सेवेत घेतले. त्यांची थेट क्राईम इन्टेलिजन्स यूनिटमध्ये नियुक्त केली.त्यानंतर त्यांनी वाझे यांच्या मदतीने याचे खून कर, त्याचा खून लपव, त्याच्याकडून खंडणी उकळ, मनसूख हिरेन आदी अनेक प्रकारची कामे केली. उद्धव ठाकरे स्वतः सचिन वाझेचा बचाव करण्यासाठी पुढे आले. या प्रकरणात परमबीर सिंहांविरोधात थेट पुरावे आहेत. या सर्व आधारावर या लोकांना आरोपी करण्यात आले आहे, असे ओझा म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button