आर्टिकल

धर्मरक्षक भागोजीशेठ कीर पुण्यस्मरण वर्ष ८१ वे

भागोजी शेठ कीर यांच्या रूपाने भारतात एक दानशूर भक्तिभूषण असे रत्न जन्माला आले. तो काळ म्हणजे ब्रिटिशांची भारतावर असलेल्या सत्तेचा काळ होता. त्यावेळी अनेक क्रांतिवीर जन्माला आले. पण दानशूर भक्तिभूषण भागोजीशेठ कीर केवळ एकज जन्माला आले. तो स्पृष्य-अस्पृष्यतेचा काळ होता. अस्पृष्यांना मंदिरात प्रवेश नव्हता. त्यावेळी भागोजीशेठ कीर अनेक सामाजिक संस्थांना मदत करीत होते. वि. दा. सावरकर यांना ब्रिटिशांनी त्यावेळी सामाजिक कार्य करा म्हणून सांगितले होते. पण त्यांच्याकडे आर्थिक पाठबळ नव्हते. अशावेळी सावरकरांनी दानशूर भक्तीभूषण भागोजीशेठ कीर यांच्याशी संपर्क करून मंदिर बांधण्याची विनंती केली. त्यावेळी भागोजीशेठ कीर यांचे बरोबर त्यांचे गुरु संत गाडगेबाबा महाराज होते. ते कधी मंदिरात जात नव्हते; परंतु त्यांचा समाजाला संदेश होता की माणसांमध्ये देव शोधा त्यामुळे समाजाची प्रगती होणार आहे. पद्मभूषण डॉ. धनंजय कीर आणि म. ना. वांदरकर गुरुजी आदी थोर समाजसेवक उपस्थित होते.

भागोजीशेठ कीरांना समाजासाठी काही करावे म्हणून मनापासून आवड होते. त्यांना हे कळल्यानंतर त्यांनी पतितपावन मंदिरासाठी जागा विकत घेतली. पुढे पतितांना पावन करणारे असे पतितपावन मंदिर भागोजीशेठ कीर यांनी बांधले. अशी अनेक मंदिरे, धर्मशाळा, इमारती, पाणवठे, स्मशानभूमी बांधून समाजसेवा केली. सन १९३१ मध्ये मंदिर प्रवेशाच्या वेळी त्यांनी अस्पृष्यांना प्रथम प्रवेश दिला. स्पृष्य-अस्पृष्य मिटविला, असे धर्मरक्षक भागोजी शेठ कीर.

आज हेच पतित पावन मंदिर जिर्णोद्धार करण्यासाठी पतित पावन मंदिर विश्‍वस्त पुढे सरसावले आहेत; परंतु पतित पावन मंदिर व परिसरातील बांधकामे आणि त्या खालील जागा ही मुंबई उच्च न्यायालय रिसिव्हर यांच्या आदेशाने आणि श्रीमन भागोजीशेठ कीर यांच्या वंशजांना देण्यात आलेली आहे. त्यामुळे श्रीमान भागोजीशेठ कीर यांचा नातू म्हणून पतित पावन मंदिराची मालकी श्री. अंकुर कीर यांची आहे. श्रीमान भागोजीशेठ कीर यांनी उभ्या केलेल्या सर्व वास्तू आज शंभर वर्षानंतर ही दर्जेदारपणे दिमाखात उभ्या आहेत. त्यामुळे श्री. अंकुर कीर यांनी त्यांच्या मालकीच्या पतितपावन मंदिराची जीर्णोद्धार करण्याची काही आवश्यकता नाही असे संबंधितांना कळविले आहेत.

शासनाकडून निधी मिळवून मंदिराचा जीर्णोद्धार करणार म्हणून संबंधितांनी वृत्तपत्र व सोशल मिडियावर बातमी दिली. दानशूर भक्तीभूषण श्रीमान भागोजी शेठ कीर यांनी वि. दा. सावरकर यांच्या विनंती वरून १९२८ साली शेवडे नामक व्यक्तीकडून गाडीतळ येथे २१ गुंठे जागा विकत घेऊन ७९,५७२ रुपयांना पतित पावन मंदिर व त्यांच्या शेजारी १९३१ ला धर्मशाळा बांधली. श्रीमान भक्ती भूषण भागोजीशेठ हयात असेपर्यंत पतित पावन मंदिर दिवाबत्तीपासून सहभोजन आदी सर्व खर्च श्रीमान भागोजी शेठ की स्वतःच्या कष्टाच्या पैशातून करीत होते याची नोंद भागोजी बाळोजी कीर चॅरिटेबल ट्रस्टच्या लेखा तपासणी अहवालात आहे.

श्रीमान भागोजीशेठ कीर २४ फेब्रुवारी १९४४ साली स्वर्गवासी झाले. त्यानंतर खासगी जमीन, मिळकती आणि मंदिर स्थळे १९४७ पासून मुंबई हायकोर्टाचे कोर्ट रिसिव्हर यांच्या ताब्यात होते. त्याचा निकाल २००४ रोजी झाला. या सर्व खाजगी जमिनी मिळकती आणि मंदिर स्थळे त्यांच्या वंशाच्या ताब्यात देण्यात आल्या. त्यानुसार पतित पावन मंदिर व परिसरातील बांधकामे आणि त्या खालील जागाही मुंबई हायकोर्टाचे कोर्ट रिसिव्हर यांच्या आदेशाने श्रीमान भागोजीशेठ कीर यांच्या वंशजांना देण्यात आल्या. त्यामुळे श्रीमान भागोजीशेठ कीर यांचे नातू म्हणून त्यांची मालकी श्री. अंकुर कीर यांच्याकडे आहे.

दानधर्म करणे यासाठी श्रीमान भागोजीशेठ कीर यांनी १९२६ साली ट्रस्टची स्थापना केली. स्व. कष्टार्जीत पैशाने माहीम जवळ जमीन खरेदी केली. त्या जागेत चाळी आणि अन्य भवनने उभारून त्यास श्री भागेश्‍वर भुवन, माहीम असे नाव दिले. त्याच्या उत्पन्नाचा विनियोग जनसेवेसाठी केला. पुणे जिल्ह्यात आळंदीजवळ वरवेली येथे जमीन खरेदी करून श्री ज्ञानेश्‍वर महाराजांच्या दर्शनासाठी येणार्‍या यात्रेकरूंच्या उपयोगात येणार्‍या उत्पन्नाचा विनियोग करावा, म्हणून भागोजी बाळूजी यांनी मुंबई, पुणे, वाई, नाशिक इत्यादी ठिकाणी इस्टेट खरेदी करून त्याचा व त्याच्या उत्पन्नाचा विनियोग यात्रेकरूंच्या उपयोगात करण्यात यावा असे नमूद केले. दानशूर भक्ती भूषण श्रीमान भागोजीशेठ कीर यांनी न्यासाचा हेतू व कार्य ही सर्वसामान्यांसाठी जास्त करून भंडारी समाजाचा विकास व्हावा या हेतूने न्यास स्थापन केल्याचे दिसून येते.

रत्नागिरी पेठकिल्ल्यात स्थापन केलेल्या भागेश्‍वर मंदिरात भागेश्‍वरांची नित्याचे पूजा अर्चा करणे व वार्षिक समारंभ करणे रत्नागिरी किल्ल्यावर भागेश्‍वर बालकाश्रम सुरू करून भंडारी ज्ञातील जातीतील मुलांना बौद्धिक, शिल्पकला आणि मुख्यतः उद्योगधंदे यांचे शिक्षण देणे तसेच या ज्ञातीतील होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे आणि त्यांचे शिक्षण पूर्ण होण्याकरता त्यांना परदेशी पाठवणे झाल्यास तिकडील खर्चा करिता ही शिष्यवृत्ती देणे. भंडारी समाजातील निराश्रीत मुलींची लग्न करणे. कोणत्याही अनाथ हिंदूंचे प्रेतसंस्कार करणे आणि यांना अनाथ, लंगडे, लुळे अशा लोकांना अन्नदान करणे. याप्रमाणे अनेक चांगल्या तरतुदी ट्रस्टमध्ये करून संपत्तीत मालमत्ता भागोजी शेठ कीर यांनी लोकार्पण केलेली आहे.

देवपूजा व्रतवैकल्याच्या बाबतीत शेठजी पक्के सनातनी होते. एकादशी, महाशिवरात्री, संकष्ट चतुर्थी, सोमवार या दिवशी शेटजी उपास करीत. एकादशी व महाशिवरात्रीला जेवण पूर्ण वर्ज असे. गाईंना वंदन करून शेठजी कामाला बाहेर पडत. लहर आली की शेटजी स्व हस्ते पाखरांना दाणे उडवीत. दाणे टिपणारे पाखरे पाहून शेठजींना आनंद होई. शेटजी जातीने भंडारी क्षत्रिय असून शाकाहारी होते. कदाचित हा गाडगेबाबांच्या शिकवणीचा परिणाम असेल. लाडके बाबा मात्र आपल्या कीर्तनातून सातत्याने मांसाहार विरुद्ध प्रचार करीत. बकरा, कोंबडे मारून त्यांचे मांस शिजवून खाणे पाप आहे. बकर्‍यालाही जीव आहे. कोंबडीलाही जीव आहे. तेव्हा त्यांच्या मानेवर सुरी फिरवून पोट जाळू नका. कदाचित त्याचा परिणाम होऊन शेठजींनी शाकाहारी स्वीकारला असावा.

दरवर्षीप्रमाणे शिवरात्रीचा उत्सव भागेश्‍वर मंदिरात पार पडला. २३ फेब्रुवारी १९४४ रोजी महाप्रसादाची चार-पाच हजार पाने आटोपता आटोपता दुपार झाली. भजनी मंडळींचे भजन झाले. सारे पटांगण माणसांनी खचाखच भरले होते. उत्साहाला उधाण आलेले होते. पण शेठजींची प्रकृती बिघडत होती. कार्यक्रम संपेपर्यंत शेठजींनी सारा त्रास सहन केला. अस्वस्थता वाढत होती. डॉक्टर शिंदे यांना संशय आला. भागेश्‍वराचे नाव घेत शेठजींनी प्राण सोडला. हजारोंच्या आयुष्यात आपल्या दातृत्वाने सोन्याचे क्षण निर्माण केलेला हा महामानव ईश्‍वराचा लाडका सुपुत्र काळाच्या पडद्याआड झाला.

२४ फेब्रुवारी रोजी भागोजींची ८१ वी पुण्यतिथी आहे. श्रीमान भागोजीशेठ कीर हे खरे समाज सुधारक होते. त्यांचे कार्य अपार आहे. त्यांच्या कार्याची शासनाने दखल घेऊन त्यांच्या कार्याचा आढावा घेऊन पाठ्यपुस्तकात त्यांनी केलेले कार्य अभ्यासासाठी मुलांच्या निदर्शनास आणावे, की जेणेकरून भविष्यात असे ज्ञानेश्‍वर व्यक्ती उदयास येऊन देशाचे भले व्हावे. आज पाठ्यपुस्तकातील नोंद पाहून समाज आक्रमक झालेला आहे. भागोजीशेठ कीरांनी बांधलेले पतितपावन मंदिर वि. दा. सावरकरांनी बांधले म्हणून आठवीच्या विद्यार्थ्यांना शिकवले जात आहे. याबाबत समाजाचा उठाव झालेला आहे. तरी नवीन वर्षात पुस्तकात ही चुकीची दुरुस्ती व्हावी.

संकटे आले तरी घाबरून न जाता त्यावर मात करून पुढे जाण्याचे सामर्थ्य सर्वसामान्यांवर प्रेम करणारे गरिबांचे कैवारी सामान्यांचे दुःख ते आपले दुःख मानणारे, जनसेवेसाठी चंदनाप्रमाणे जिरणारे असे भक्तीभूषण दानशूर श्रीमान भागोजी शेठ कीर यांच्या ८१वी पुण्यतिथीनिमित्त श्री भैरी मंदिर खालची आणि रत्नागिरी येथून मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता रॅली निघणार आहे. तर १२ वाजता सहभोजन व सहभजन आहे. यात सर्व जमातीतील जनतेने उपस्थित राहून अभिवादन करावयाचे आहे.

सुरेंद्र यशवंत घुडे (9404994498)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button