देवरूख येथे सप्तलिंगी नदी परिषद

संगमेश्वर : नदी म्हणजे संस्कृती, नदी संवर्धन हा जगण्याचा, संस्कृती जपण्याचा प्रयत्न आहे. नदीला आईचे रूप मानतात; मात्र आपल्या गावातून वाहणाऱ्या या नदीची म्हणजे आपल्या ‘आईची ‘दुर्दशा आपण उघड्या डोळ्याने पहात असतो. या प्रश्नाकडे समाजाचे आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रेमाचा दिवस असलेल्या व्हॅलेंटाइन डे दिवशी तालुक्यातील देवरूख या ठिकाणी पंचायत समितीच्या कार्यालयातील सभागृहात ‘सप्तलिंगी नदी परिषद’ १४ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली होती.
देवरूखमधील क्रांती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष निखिल कोळवणकर आणि संगमेश्वर तालुका ऍग्रोस्टार फॉर्मफ्रेश प्रोड्युसर कंपनी लिमिटेडचे विलास शेलार यांच्या पुढाकाराने या राऊंड टेबल परिषदेचे आयोजन केले होते. ही परिषद खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात झाली. तसेच यशस्वी झाली. सुट्टीचा दिवस नसताना ही १८ गावांतील सुमारे ८० हून अधिक नागरिक या परिषदेला उपस्थित होते.
पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या या नद्या उन्हाळ्यात का आटतात? अजूनही काही गावांना एप्रिल, मे महिन्यात टँकरने पाणी पुरवठा केला जातो. कोकणात सर्वांत जास्त पाऊस पडून ही या पावसाचे पाणी अडविण्याचे आणि जिरविण्याची कोणतीच यंत्रणा नाही का?कागदोपत्री शासनाकडे कदाचित ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ सारख्या योजना असतील ही; पण पावसाळ्यात पडणारे पावसाचे पाणी नदी, पऱ्यामार्फत शेवटी समुद्रात वाहून जाते हे वास्तव आहे.
अंदाजे तीन ते चार हजार मिलिमीटर दरवर्षी पाऊस कोकणात पडत असेल तर एवढे पाणी जमिनीत मुरवण्याचे प्रयत्न गावागावात राहणारा कोकणी माणूस का करीत नाही. सगळे सरकार करील या भरवश्यावर तो अजूनही का अवलंबून आहे. स्वतः किंवा वाडी, गावाच्या सामूहिक प्रयत्नाने तो पाणी अडविण्याचे शिवधनुष्य का उचलत नाही. पावसाळ्यात प्रत्येक घराच्या छपरावर अंदाजे अडीच ते तीन लाख लिटर पाणी पडून ते वाहून जाते. सप्तलिंगी नदीकिनारी असलेल्या १८ गावांतील सगळ्या गावाने नाही म्हणत पण किमान प्रत्येकी शंभर घरांनी म्हणजे एकूण किमान १ हजार ८०० घरातील लोकांनी छपरावर पडणारे पाणी अडवून जमिनीत जिरवण्याचे प्रयत्न केले, तरी दरवर्षी अंदाजे ५०० कोटी लिटर पेक्षा जास्त पाणी जमिनीत साठवले जाईल, या अशा महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
भूगर्भातील पाणी साठे हळू हळू कमी होत चालले आहे, असे जगभरचे शास्त्रज्ञ आणि पर्यावरणवादी लोक ओरडून सांगत आहेत. पण आम्हाला पाणी मिळते ना मग इतरांची गरज मी का बघू ही भूमिका आता सोडून दिली पाहिजे. जमिनीच्या सातबारा वर तुमचे नाव असेलही पण भूगर्भातील पाण्याच्या सातबाऱ्यावर पण आपण लक्ष द्यायला हवे.
नदी नैसर्गिकरीत्या प्रवाही ठेवायला हवी, केवळ एका गावातील गाळ काढून नदी स्वच्छ होणार नाही तर उगमापासून शेवटापर्यंत एकाच वेळी नदीतील गाळ काढून छोटे छोटे बंधारे घातले पाहिजेत. शेती करण्यासाठी आपण जमीन नांगरतो तशी नदी नांगरली पाहिजे. गाळाने बुजलेले झरे नदी नांगरून मोकळे केले पाहिजेत. नदी किनारी झाडे लावली पाहिजेत.इंग्लड युरोपमध्ये नदीची खूप चांगल्या पद्धतीने देखभाल केली जाते. पर्यटन उद्योग म्हणून नदीकडे पाहिले जाते. युरोप मधील अनेक देश आणि यूके मधील अनेक शहरात किंबहुना भारतातील गोवा, केरळ ही राज्ये पर्यटनावर उभी आहेत. एक नदी गावाचे अर्थकारण आणि संस्कृती बदलून टाकते. २६ जूनच्या पावसात मुंबईकरांनी मिठी नदीचा आणि दोन वर्षांपूर्वी चिपळूणकरांनी वाशिष्ठी नदीचा रुद्र अवतार पाहिलेला आहे.
सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या हरपुडे या गावात सप्तलिंगी नदीचा उगम होतो. खरे म्हणजे हरपुडे, तळवडे आणि हातीवमधले ओढे एकत्र होवून ही नदी बनते. कोकणात ओढ्याला पऱ्या म्हणतात. पुढे हिचा विस्तार होत ही नदी मुरादपूर, देवरूख, पाटगाव, साडवली, पूर, कुडवली, धामापूर, ताम्हाणे, सांगवे, फणसट, आंबवली, घोडवली, चांदीवणे, तळेकांटे करीत मुंबई- गोवा महामार्गालगत असलेल्या वांद्री गावात येते. १८ गावांतील प्रवास संपवून ती शेवटी बावनदीला मिळते आणि तिथून तिचा प्रवास समुद्राच्या दिशेने होतो.
हरपुडे गावातील उगमापासून ते वांद्री गावाच्या शेवटापर्यंत या नदीचा ३३ किलोमीटरचा प्रवास होतो. या प्रवासात १८ गावांतील सप्तलिंगी नदीवर बारा शिवलिंग आहेत, असे निखिल कोळवणकर यांनी सांगितले. मार्लेश्वर, वाडेश्वर, निळकंठेश्वर, आकार वाकोबा, काशीविश्वेश्वर, दुबळेश्वर, रामेश्वर, सांब, सोमेश्वरची दोन ठिकाणे, चंद्रेश्वर, हरिहरेश्वर अशा या अठरा गावातील ही बारा शिवलिंग आहेत.
ही नदी संवर्धनाची चळवळ पुढे नेण्याची जबाबदारी आता या गावातील लोकांची आहे. त्यासाठी शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म कार्यक्रम आखले पाहिजे. शासनाच्या जिल्हा जलसंपदा विभागामध्ये सप्तलिंगी नदीला नदी म्हणून मान्यता मिळण्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे. त्यानंतर या नदीचा आराखडा आणि नोटीफिकेशन करावे लागेल. संबंधित गावांमध्ये जाऊन ग्रामस्थांच्या सभा घ्याव्या लागतील. गावातील कुणा एक दोघांवर तशी जबाबदारी द्यावी लागेल. संपूर्ण ३३ किलोमीटरची शक्य नसेल, तर किमान आपल्या आणि शेजारच्या गावातून जाणाऱ्या नदीची परिक्रमा केली पाहिजे. त्यातून नदीच्या किनारी वसलेल्या गावची संस्कृती आपल्या पुढच्या पिढीला पोहचवता येईल. नदीला घेऊन छोटे छोटे इव्हेंट करावे लागतील. नदी किनारी जमिनीची धूप थांबणारी झाडे लावावी लागतील. छोटे छोटे बंधारे बांधून पाणी अडविले पाहिजे आणि त्या पाण्यावर शेती पूरक उद्योग सुरू केले पाहिजे, असे काही पर्याय चर्चेअंती निश्चित करण्यात आले.



